आर्थिक वर्षात करा पैशांचे व्यवस्थापन; गरज विकत घ्या, परंतु इच्छा नको


जेऊर, दि. 1 (गौरव मोरे)-
जर वर्षी आर्थिक वर्ष म्हटले की तुमच्या समोर येतो 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी. यामध्ये आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे नवीन वर्षात अनेक आर्थिक बदलांची अंमलबजावणी होत असते. त्यामुळे आपण गरज असलेले विकत घेऊन आर्थिक नियोजन करावे इच्छा आहे म्हणून विकत घेऊ नये.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैशांचे नियोजन होय. जरी तुमचा दृष्टिकोन जगण्यासाठी पैशाची गरज असली, तरी त्यामुळे तुमचे जीवन विस्कळीत होऊ देऊ नका किंवा तुमच्यात अनावश्यक चिंता निर्माण होऊ देऊ नका.आनंदी जीवन जगण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज नाही. पैशाने तुम्ही बऱ्याच मौल्यवान गोष्टी विकत घेऊ शकत असला, तरी तुमच्या जीवनासमोर त्यांना काहीच मोल नाही. तेव्हा, आहे त्यात समाधानी या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुमचे कुटुंब एक आनंदी जीवन जगू शकेल.
योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी प्रथम आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या वेळीच ओळखून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. असे केल्यास कोणताही ताणतणाव न येता हसत खेळत आर्थिक नियोजन योग्य प्रकारे होऊ शकते.
आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीतजास्त घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. आपल्या गरजा, ध्येय, उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय.
प्रत्येकाने स्वतःचे आर्थिक नियोजन केलेचं पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट आणि अगदीच नकोसा वाटणारा आहे. आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु करालं तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात ह्याचे फायदे नक्की मिळतील आणि आर्थिक नियोजन चांगलेच होईल.
विमा काढणे गरजेचे-
प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असायला हवा.विचार करा, जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर काय संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल. म्हणूनच सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे आजची गरज आहे.
पैशांची बचत करा-
विशिष्ट पैशांची बचत करण्यासाठी काही नियम आपण स्वतःहा करू शकता.आपल्या उत्पन्नातून कमीत कमी ५-१० टक्के तरी बचत करायलाच हवी. महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीमधून सर्वात आधी सेविंग करावे, सेविंग करून नंतर उरलेले पैसे खर्चकामासाठी उपयोग करावे.
गुंतवणूकीवर भर द्या-
आपल्या उत्पन्नातून आपल्या ध्येयांसाठी म्हणजेच घर, लग्न कार्य करणे, परदेशी सहल, चारचाकी गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, वृद्धापकाळात पेन्शन ह्या गोष्टीसाठी वेगळी तरतूद असायला पाहिजे. केलेल्या बचती मधून वरील ध्येयं पूर्ण होऊ शकत नाही कारण बचत रक्कम मधून मिळणारा परतावा खुपच कमी असतो. यासाठी आपण विविध प्रकारे गुंतवणूक करून महागाई वर मात करून जास्ती रिटर्न्स मिळवून आपली ध्येयं पूर्ण करू शकतो. त्यासाठी सोने स्थावर मालमत्ता, चिट फंड, म्युचिअल फंड आदी गुंतवणूकीवर भर देणे गरजेचे आहे.
156 वर्षांची परंपरा-
आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च ला 156 वर्षांची परंपरा आहे. भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष 1867 मध्ये ब्रिटीश सरकारने सुरू केलेले होते. जिथे जिथे होते तेथे त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी असे आर्थिक वर्ष योजलेले होते.
गरज विकत घ्या, इच्छा नको-
केवळ आपल्याला गरज असलेल्या गोष्टी विकत घ्याव्या, इच्छा असलेल्या नाही. गरज आणि इच्छा यांच्यात मोठा फरक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एका नवीन फोनची गरज आहे, परंतु इच्छा असते एक आयफोन घेण्याची. त्यामुळे आपण विनाकारण जास्त पैसे खर्च करतो. आणि विनाकारण आर्थिक फटका ही बसतो
गरज आणि इच्छा यांच्यातील फरक करणे गरजेचे आहे.

