दहिगावं उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणार- आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणीस यश

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पूर्व भागास वरदायिनी ठरलेल्या दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या सौर उर्जीकरणाची मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१८ पापून केली होती.
याबाबत त्यांनी सततचा पाठपुरावा चालू ठेवला. मध्यंतरी आमदार पदावर नसतानाही २०१९ ते २०२४ दरम्यान दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत त्यांनी सतत पाठपुरावा केला. परंतु सन २०२४ मध्ये करमाळा मतदार संघातील जनतेने त्यांना परत एकदा आमदार पदावरुन काम करण्याची संधी दिली.
यानंतर त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नव्याने मुख्यमंत्री महोदयांना एक लेखी निवेदन देऊन दहिगाव उपसा सिंचन योजना चालवत असताना येणाऱ्या वीज बिलाची तपशीलवार माहिती व हि योजना सौर उर्जेवर चालवल्यास शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक दिलासा याबाबत तपशीलवार माहिती दिली.
यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला असुन या योजनेच्या सौर उर्जीकरणाचा अहवाल संबंधित विभागाकडून मागितला आहे.
याबाबत सविस्तर बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, वास्तविक पाहता शासन निर्णय ५ एप्रिल २०२४ अन्वये राज्यातील सर्व उच्चदाब व अतिउच्च दाबाच्या उपसा जल सिंचन योजनांचे सौर उर्जीकरण कराव्यात यास मान्यता देण्यात आली आहे. परंतू तरीही दहिगाव उपसा सिंचन योजनेबाबत मात्र कसलेही पाऊल संबंधित विभागाकडून उचलले गेले नव्हते. ही बाब आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगून उर्जीकरण करण्याबाबत विनंती केली असता महाराष्ट्र शासनाचे सह सचिव श्री.कराड यांनी राज्याच्या महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दहिगाव उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
यामुळे आता दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या सौर उर्जीकरणाच्या कामाच्या मान्यतेबाबत सकारात्मक प्रतिसाद शासनाकडून मिळाला असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.