केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर असून विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे असल्याचा हल्लाबोल पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
यावेळी सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने केळीसह झालेल्या इतर पिकांच्या नुकसाना विषयी तपशीलवार माहिती सादर केली. तसेच केळी हमीभाव व शेलगाव वांगी येथील केळी व ऊस संशोधन केंद्र याबाबतही साकडे घातले. विशेष म्हणजे आठ डिसेंबर पासुन नागपूर येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुध्दा हे प्रश्न मांडले जावेत यासाठी लेखी स्वरुपात वेळेच्या आत मागणी केली. आणि मग एवढा पाठपुरावा विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केल्यानंतर काही विरोधकांना जाग आली व त्यांनी वर्तमान पत्र आणि सोशल मिडीयातुन केळी उत्पादकांना हमीभाव मिळावा म्हणून पुतणाबाईचा पान्हा दाखवण्याचे एक प्रकारे नाटकच केले.
आजही दुरदर्शन केंद्रावर आमच्या मुकबधीर बांधवाना जगात देशात काय चालले आहे हे समजण्यासाठी आठवड्यातुन एकदा त्यांच्याच भाषेत हातवारे करुन घडामोडींची माहिती बातमी स्वरुपात दिली जाते यात आठवड्यापुर्वी झालेल्या घडामोडींचाही समावेश असतो.
अगदी त्याच प्रमाणे आमच्या विरोधकांनाही केळी उत्पादकांना न्याय मिळावा एका आठवड्यानंतर समजले. अतिवृष्टीमुळे शेटफळ, कुगाव, चिखलठाण, केडगाव, पांगरे, कविटगाव या भागासह विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी अगदी चिखलपाण्यातुन केळी, कांदा, ऊस, उडीद, मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करुन धीर दिला व शासकीय मदतीसाठी प्रत्यक्षात कृषी व महसूल विभागातील अधिकारी बरोबर घेऊन पिकांचे पंचनामे करायला लावले तेंव्हा आमचे विरोधक काचेच्या बंगल्यात टिव्ही समोर बसुया सह कुटुंब हसुया म्हणत सोनी मराठी चॅनेल महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहत होते.
ज्यावेळी त्यांचे कडे सत्ता होती त्यावेळी केळी तर सोडाच पण भरगोस असलेल्या ऊस उतपादकांचीही आर्थिक पिळवणुक केली. तेच आज केळी उत्पादकांना न्याय देण्याची भाषा करत आहेत.करमाळा तालूक्यात केळीचे उत्पादन हे सन २०१४ नंतरच तत्कालीन आमदार नारायण आबा पाटील यांच्या कालावधीत वाढले गेले. याच दरम्यान दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन आमदार नारायण आबा पाटील यांनी केळी उत्पादित क्षेत्र वाढवले. यामुळे येणाऱ्या काळातही विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्थ असल्याचा ठाय विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलून दाखवला.
तसेच विरोधकांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिल्याबद्दल आपला आक्षेप नाही. कोणासही या प्रश्नावर आवाज उठवता येतो पण त्यामागचा उद्देश स्वच्छ असावा असा मार्मिक टोलाही तळेकर यांनी लगावला.





