गौंडरे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट: विद्युत मोटारी, मेगा स्टार्टर, मोटारसायकल नंतर आता ट्रॅक्टरही जाऊ लागले चोरीला; नागरिक हैराण


करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे गेल्या काही वर्षांपासून एका पाठोपाठ एक चोरीची साखळी अखंडितपणे सुरू असून सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या कडब्यांच्या गंजी, जनावरांचे गोठे, लोकांची छपरे पेटवली जायची. गावातील जवळपास चाळीस -पन्नास घटना घडूनही हे नेमके कोण करत आहे याचा तपास लागला नाही. या घटनेच्या त्यावेळी अनेक वर्तमानपत्रातही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांच्या पाइपलाइन फोडणे, स्टार्टर-मेगा चोरीला जाऊ लागले. एवढ्यावरच न थांबता विद्युत पंप चोरीच्या घटना घडू लागल्या. एक-दोन नाही तर गावातील जवळपास पन्नास पेक्षा अधिक पंप चोरीला गेले. एकाच शेतकऱ्यांचे दोन – तीन पंप लागोपाठ चोरीला गेले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी घटनेची फिर्यादही दाखल केली. परंतु अद्यापपर्यंत याचा गुन्हेगार पकडला गेला नाही. गेल्या वर्षी गावातील नागरिकांच्या मोटारसायकली चोरीला गेल्या. जवळपास सात ते आठ टू व्हीलर गाड्या चोरीला गेल्या. काही दिवसानंतर मात्र या सर्व गाड्या गावाशेजारील एका विहिरीत गंजलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
काही दिवसांनंतर काल रात्री परत एक मोठी चोरीची घटणा समोर आली आहे. स्वराज कंपनीचा एक ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. राजेंद्र सुखदेव कासविद यांचा नवीन ट्रॅक्टर क्रमांक MH45AQ3652 गौंडरे फाट्याच्या जवळच आपल्या शेतात असलेल्या राहत्या घरासमोरून रात्री एक-दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. एकूणच सर्व घटनेचा विचार केला तर चोरी ही वरचेवर मोठ्या स्वरूपात वाढत चालली आहे. वेळीच याचा बंदोबस्त केला नाही तर, आणखीही मोठ्या स्वरूपातील घटना समोर येऊ शकतील अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाने एका मागून एक चोरीची अखंडितपणे श्रंखला घडत असूनही, पोलीस यंत्रणेला यामागील गुन्हेगार अद्यापपर्यंत पकडता आलेला नाही. गुन्ह्याचा तपास लागत नाहि की जाणूनबुजून दिरंगाई होते आहे याबाबत उलट सुलट चर्चा आज गावामध्ये सुरू आहे. या सर्व घटनेचे प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे. आज गावातील प्रत्येकजण भयभीत, दहशतीखाली जगत आहे. या सर्व गुन्ह्यांच्या पाठीमागे असणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडुन सामान्य नागरिकांना अभय द्यावा हीच मागणी सर्व नागरिकांतून होताना दिसत आहे.

