जेऊर : दहा हजारांची लाच घेतल्याच्या आरोपातून तलाठ्याची निर्दोष मुक्तता

यात आरोपी तर्फे अॕड मिलिंद थोबडे, अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी तर सरकार तर्फे प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.
जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
बक्षीसपत्राच्या आधारे उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारल्याच्या आरोपातून जेऊर येथील तलाठी राजेंद्र गंगाधर पांडेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी की, तक्रारदार बाळासाहेब अभिमान घरगुटे-पाटील (बिटरगावं) यांची पत्नी मंगल हिला तिच्या आईने काही जमिनी बक्षीसपत्राने दिल्या होत्या. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने आरोपी तलाठी पांडेकर याच्याशी संपर्क साधला असता, त्याने नोंद करण्यासाठी पंधरा हजारांची लाचेची मागणी केली व दहा हजार स्वीकारण्याचे मान्य केले व त्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही हे स्पष्ट सांगितले.
त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क करून सापळा लावून लाचेची रक्कम स्वीकारताना पांडेकर यास रंगेहाथ पकडले तसेच याबाबतची फिर्याद उपअधिक्षक अरूण देवकर यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिली. सदरील तपास सहाय्यक निरिक्षक कविता मुसळे यांनी करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र पाठविले होते असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. तर आरोपी तर्फे अॕड मिलिंद थोबडे यांनी युक्तिवाद केला की, तक्रारदाराचे काम आरोपीकडे प्रलंबित नव्हते. बिटरगावच्या तलाठी पदाचा पदभार नव्हता, तक्रारदार व पंच यांच्या साक्षीत तफावत आहे. त्यामुळे आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या युक्तिवादात त्यांनी खटल्यातील बारकावे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने तो युक्तिवाद ग्राह्य धरला. बार्शीचे सत्र न्यायाधीश श्री एस. डी. अग्रवाल यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

