जेऊर ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार ; पहा जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास


जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाटील गट आणि शिंदे गटांमध्ये दुरंगी लढत होत आहे. पाटील गटाचा पारंपरिक विरोधी बागल गट या निवडणुकीत दिसणार नाही, यावेळी पहिल्यांदाच शिंदे गट निवडणूक लढविणार आहे.
जेऊर हे गाव टेंभूर्णी-नगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ह्या गावातून मध्य रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहे. जवळजवळ ३० ते ४० गावे जेऊर ला जोडली गेलेली असून करमाळ्याची राजधानी आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे.
15 सदस्य संख्या असलेल्या “जेऊर ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यामुळे ही निवडणूक पारंपारिक पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत होणार आहे.
- सरपंचपदासाठी तिरंगी लढत
- जेऊर ग्रामपंचायतच्या इतिहासात आता दुसऱ्यांदा जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद ओबीसी साठी राखीव असून यासाठी तिरंगी लढत होत आहे.
- पाटील गटांकडून नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे निवडणूक लढवित असून पृथ्वीराज पाटील यांची युवा वर्गात चांगली पकड आणि जनसंपर्क आहे, गेल्या विधानसभेपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. वेगवेगळ्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. माजी आमदार पाटील यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला असून ह्या निवडणूकीत विजय मिळवून भविष्यात पाटील गटाची धुरा मजबूत करण्यावर आणि तालुक्याच्या राजकारणात काम करण्याची त्यांना संधी मिळू शकते.
- शिंदे गटांकडून संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके हे निवडणूक लढवित आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवित असले तरी सामाजिक कार्यात ते अग्रभागी राहिलेले आहे. संभाजी ब्रिगेडच्या मार्फत त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. ह्या निवडणुकीत विजय मिळवून सामाजिक कार्या नंतर राजकारणात काम करण्याची संधी मिळू शकते.
- पाटील गटाचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले बाळासाहेब कर्चे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत निवडणूक असेल तेव्हा तेव्हा श्री कर्चे यांनी निवडणूक लढविलेली आहे. अगोदर बागल गट त्यानंतर यावेळी शिंदे गटात होते. परंतु ऐनवेळी सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्यामुळे यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक काम, जेऊर पेठेतील संबंध यावेळी किती फायदेशीर ठरेल हे पहावे लागेल, निवडणूक जिंकून जेऊरच्या राजकारणात येण्याची संधी मिळू शकते.

31 वर्षांची सत्ता अबाधित राहणार?
जेऊर ग्रामपंचायतवर 1992 पासून शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांची सत्ता आहे ही सत्ता आबाधित राहणार की शिंदे गटाला कौल मिळणार हे येत्या सहा तारखेला कळेलच करमाळा-LIVE ला मिळालेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूका पार पडलेल्या आहेत. यामध्ये बदल होण्याची शक्यता ही आहे.
1992 ग्रामपंचायत निवडणूक-
1992 ला जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार नारायण आबा पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1992 ला नारायण आबा पाटील यांची सरपंचपदी तर धनराज कोठारी यांची उपसरपंच पदी निवड झाली.
1997 ग्रामपंचायत निवडणूक-
1997 ला पाटील गटाची सत्ता लागली, नारायण आबा पाटील त्यावेळी पंचायत समितीचे सभापती झाल्यामुळे 1997 ला सरपंच पदी सुल्लेमान मुल्ला यांची तर उपसरपंच पदी जांबुवंत धन्यकुमार दोशी यांची उपसरपंच पदी निवड झाली.
2002 ग्रामपंचायत निवडणूक-
2002 सालची ग्रामपंचायत निवडणूक सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. माजी मंत्री स्व.दिगंबरराव बागल यांनी पाटील गटाच्या विरोधात पॕनल उभा केला होता, स्वतःहा स्व दिगंबरराव बागल निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते परंतु या निवडणुकीत पाटील गटाने बागल गटाचा दारूण पराभव केला, या निवडणुकीत 13 पैकी 13 जागा जिंकून पाटील गटाने सत्ता मिळविली, 2002 साली पाटील गटाचे भास्कर कांडेकर यांची सरपंच तर राजेंद्र जगताप यांची उपसरपंच पदी निवड झाली.
2007 ग्रामपंचायत निवडणूक-
पाच वर्षे सरली 2007 मध्येही निवडणूक रंगतदार झाली पाटील आणि बागल गटात ही निवडणूक चांगलीच अटीतटीची झाली. या निवडणुकीत चमत्कार झाला. पाटील गटाची सत्ता या निवडणुकीत आली परंतु 13 पैकी 11 सदस्य पाटील गटाचे तर 2 सदस्य बागल गटाचे निवडून आले. 2007 साली पाटील गटाचे अनिलकुमार गादिया यांची सरपंचपदी तर रामदास कोठावळे उपसरपंच पदी निवड झाली.
2012 ग्रामपंचायत निवडणूक-
या निवडणुकीत जेऊर मध्ये 2 जागा जास्त वाढल्या यावेळी 15 जागांसाठी निवडणूक होणार होती. मागील दोन निवडणुकीत सत्ता न मिळाल्यामुळे बागल गटाने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी जोर लावला या निवडणुकीत ही पाटील गटाने सत्ता कायम ठेवली 15 पैकी 13 जागा पाटील गटाने तर 2 जागा बागल गटाने जिंकल्या. 2012 साली पाटील गटाच्या रुक्मिणी भास्कर कांडेकर सरपंच पदी तर धनंजय शिरसकर यांची उपसरपंच पदी निवड झाली.
2017 ग्रामपंचायत निवडणूक-
2017 ची निवडणूक खास होती, प्रथमच जनतेतून सरपंचपदासाठी निवड होणार होती. या निवडणुकीत बागल गटातील काही सदस्य पाटील गटात सामील झाले, बागल गटातील ताळमेळ च्या अभावामुळे पाटील गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या. प्रभाग-3 मधून जरीन मुल्ला, प्रभाग-4 मधून धनश्री पाथ्रुडकर तर प्रभाग-5 मधून रोहिणी सुतार बिनविरोध निवडून आल्या. तर 12 जागांसाठी 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 13 पैकी 13 जागा पाटील गटाने जिंकल्या, जेऊर ग्रामपंचायतवर एकहाती वर्चस्व राखले. बागल गटाच्या तब्बल सहा उमेदवारांचे डिपाॕजिट जप्त झाले. सरपंचपदासाठी पाटील गटातून संगीता साळवे, बागल गटातून कोमल लोंढे तर अपक्ष म्हणून सीमा मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली या निवडणुकीत संगीता साळवे यांना 1991 मते मिळाली कोमल लोंढे यांना 870 तर अपक्ष सीमा मोरे यांना 310 मते मिळाली पाटील गटाच्या संगीता साळवे 1121 मतांनी निवडून आल्या. उपसरपंच पदी अगोदर बलभीम जाधव तर नंतर अंगद गोडसे हे विराजमान झाले.
गेल्या 31 वर्षांपासून जेऊर ग्रामपंचायत वर पाटील गटाची सत्ता आहे. मागील चार पंचवार्षिक निवडणुका लढवणारी बागल गट या निवडणुकीत पहायला मिळाणार नाही, पाटील विरोधी गट एकत्र येऊन आणि बागल गटातील कार्यकर्ते शिंदे गटात येऊन ही निवडणूक होत आहे. पाटील गटासाठी निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे तर दुसरी कडे शिंदे गटाला जर ह्या निवडणूकीत यश मिळाले नाही तर त्यांच्यासाठी ही अस्तित्वेची लढत असणार आहे.
2023 ग्रामपंचायत निवडणूक पुढीलप्रमाणे होणार आहे-
प्रभाग क्रमांक- 1
1) धनंजय शिरस्कर (पाटील गट) ❌ आदिनाथ माने (शिंदे गट)
2) नागेश झांजुर्णे (पाटील गट) ❌ अमर गादिया (शिंदे गट)
3) उषा गरड (पाटील गट) ❌ प्रिती लोंढे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक-2
1) शुभम कोठावळे (पाटील गट) ❌ अतुल निर्मळ (शिंदे गट)
2) शिवांजली कर्णवर (पाटील गट) ❌ कांचन शिरसकर
3) सागर भगत (पाटील गट) ❌ निकील मोरे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक-3
1) मालन निमगिरे (पाटील गट) ❌शितल गादिया (शिंदे गट)
2) शबाना पठाण (पाटील गट) ❌ प्रियंका गावडे (शिंदे गट)
3) उमेश मोहिते (पाटील गट) ❌ महेश कांडेकर (शिंदे गट)
(टीप- या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला साठी राखीव असल्यामुळे 1 आणि 2 नंबर मध्ये लढत वेगवेगळी असू शकते.)
प्रभाग क्रमांक-4
1) ओंकार कांडेकर (पाटील गट) ❌ बालाजी गावडे (शिंदे गट)
2) अलका किरवे (पाटील गट)❌ पुनम कदम (शिंदे गट)
3) प्रियांका निर्मळ (पाटील गट) ❌ प्रिती लोंढे (शिंदे गट)
(टीप- या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला साठी राखीव असल्यामुळे 2 आणि 3 नंबर मध्ये लढत वेगवेगळी असू शकते.)
प्रभाग क्रमांक- 5
1) संदीप कोठारी (पाटील गट) ❌ अभयराज लुंकड (शिंदे गट)
2) समिरा दोशी (पाटील गट) ❌ धनश्री पाथ्रुडकर (शिंदे गट)
3) रोहिणी सुतार (पाटील गट) ❌ कांचन शिरसकर (शिंदे गट)


- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ चे कृषी तज्ञ तुषार अहिरे यांनी केले आवाहन
- २३ वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ सालच्या बॕच ने केले अनोखे गेट-टू-गेदर
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण
- पोथरे येथील मथुराबाई देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन
- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार दिनेश मडके ‘महाराष्ट्र महागौरव’ पुरस्काराने सन्मानीत