06/06/2025

करमाळा परिवर्तनच्या वाटेवर, प्रचार अंतिम टप्प्यात ; तिरंगी असणारी निवडणूक दुरंगी मोडवर- पाटील-शिंदे यांच्यातच थेट सामना

0
IMG-20241114-WA0029.jpg

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून करमाळ्यात परिवर्तनाची लाट येणार अशी चर्चा सुरू असून निवडणूक लागल्यापासून पाटील-शिंदे-बागल यांच्यात तिरंगी असणारी निवडणूक आता पाटील-शिंदे यांच्यात थेट दुरंगी लढत होत असून अटीतटीच्या या सामन्यात कोण बाजी मारणार हे २३ नोव्हेंबरला समजणार आहे.

करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नारायण आबा पाटील, अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे तर शिवसेना शिंदे गटातून मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल अशी पारंपरिक गटांमध्ये लढत होत आहे.

प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलेला असून पहिल्यापासून तिरंगी वाटणारी निवडणूक आता दुरंगी मोडवर येऊन थांबली आहे, माजी आमदार नारायण आबा पाटील आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्यातच दुरंगी लढत मानली जात असून दिग्विजय बागल हे रेस मध्येही नाही अशी चर्चा तालुकाभर सुरू आहे. अशातच परिवर्तनाची लाट करमाळ्यात येणार असल्याचे बोलले जात असून माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे पारडे सध्यातरी जड आहे.

करमाळ्यात पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी बागल-शिंदे-पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २०१९ ला हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात लढले होते. २०१९ प्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांना सफरचंद हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे तर रश्मी बागल यांच्या ऐवजी दिग्विजय बागल निवडणूक लढवित असून २०१९ प्रमाणे यावेळीही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तर नारायण आबा पाटील यावेळी तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह घेऊन निवडणूक वाढत आहेत.

यावेळी विधानसभेला सत्तांतर होण्याची शक्यता असून मविआ कडून लढणारे नारायण आबा पाटील यांचे पारडे जड असून नारायण आबा पाटील पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य तसेच स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दल ची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेला पाठिंबा, करमाळ्यातील सावंत गटाचा पाठिंबा यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग सध्या सुसाट पहायला मिळत आहे.

वर्तमान इतिहास पहायचा झाला तर
सध्या विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (अपक्ष), दिग्विजय बागल (शिवसेना-शिंदे गट), मविआ कडून नारायण आबा पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. करमाळा विधानसभेसाठी १५ जण रिंगणात उभे आहेत.

महत्त्वाचे म्हणजे २०१४ प्रमाणे यावेळीही आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावाचे दोन आणखी अपक्ष निवडणूक लढत आहेत. २०१४ लाही दोन अपक्ष उमेदवारांनी जवळजवळ २८०० मते घेतली होती, अन् संजयमामा शिंदे यांचा २३६७ मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी हे दोन उमेदवार किती मते घेणार हे बघण्यासारखे राहणार आहे. तर लोकसभेला भाजप मध्ये प्रवेश केलेले बागल यांनी करमाळा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे २०१९ प्रमाणे पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत. मागील दोन विधानसभेला विजयाची हुलकावणी मिळालेल्या बागलांना यावेळी जनता तारणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

जेव्हा-जेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा-तेव्हा सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणूकीवर लागलेले असते. सध्या तालुक्यात पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर १९९९ नंतर प्रत्येक विधानसभेला नवा चेहरा निवडून येत आहे. १९९९ ला कै. दिगंबरराव बागल अपक्ष निवडून आले होते, २००४ मध्ये शिवसेनेकडून जयवंतराव जगताप आमदार झाले होते, २००९ मध्ये राष्ट्रवादी कडून माजी आमदार श्यामल बागल निवडून आल्या होत्या, २०१४ मध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नारायण आबा पाटील निवडून आले होते तर २०१९ ला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडून आले आहेत.

२००४ मध्ये राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्रट्विस्ट आला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली या निवडणूकीत १९९९ निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली आणि नेहमी प्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरूद्ध कौल दिला शिवसेनेचे जयवंत जगताप (६२६९२ मते) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कै दिगंबरराव बागल (५९०५२ मते) यांचा पराभव केला.

२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे २००६ साली आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. तर २००४ निवडणूकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टी कडून निवडणूक लढविली तर त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून समाजवादी पार्टी कडून निवडणूक लढविली. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्यामल बागल (७०९४३ मते) घेऊन जनसुराज्य चे नारायण पाटील (४३१२६ मते) आणि समाजवादीचे जयवंतराव जगताप (२५४११ मते) यांचा पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत पाटील यांनी केवळ (१३८१५ मते) पडली.

या निवडणूकीत प्रथमच ३१ वर्षांचा इतिहास पुसला गेला तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्ष्याचे सरकार त्या उमेदवाराला कौल दिला.

२०१४ विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. आतापर्यंतचे इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहामीच गटातटाचे राजकारण घडले पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्याचा आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर कॉंग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील (६०६७४ मते) घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल (६०४१७ मते) स्वाभिमानीचे संजय शिंदे (५८३०७ मते) आणि कॉंग्रेसचे जयवंतराव जगताप (१४३४८ मते) यांचा पराभव केला शिवसेनेचे नारायण पाटील हे २५८ मतांनी विजयी झाले. आणि २००९ विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला.

२०१४ विधानसभा निवडणूकीत प्रथमच विधानसभा लढविणारे संजयमामा शिंदे यांना पडलेले मतदान हे सर्वांचे भुवया उंचविणारे होते. शिवसेनेचे नारायण आबा पाटील पहिल्यांदाच विधानसभेत गेले. 2014 विधानसभेला नारायण पाटील (शिवसेना)-६० हजार ६७४, रश्मी बागल (राष्ट्रवादी काँग्रेस)-६० हजार ४१७, संजयमामा शिंदे(स्वाभिमानी शेतकरी संघटना)-५८ हजार ३७७, जयवंतराव जगताप (काँग्रेस आय)-१४ हजार ३४८, जालिंदर जाधव(मनसे)-१ हजार १४६, नोटा-७३६ शिवसेनेचे नारायण पाटील हे २५७ मतांनी विजयी झाले होते.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सर्वांना लक्षात राहील अशी होती, भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळून ही नाट्यमय घडामोडी नंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस चे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना अचानक शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आणि राज्यात जुलै २०२२ मध्ये शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.

२०१९ विधानसभेला करमाळा मतदारसंघात निवडणूक लागण्याच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले होते, जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी कापून रश्मी बागल यांना देण्यात आली. नाट्यमय घडामोडी नंतर रश्मी बागल शिवसेनेकडून तर माजी आमदार नारायण पाटील आणि आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडणूक लढले. अतिशय चुरशीची आणि शेवट पर्यंत चाललेल्या निवडणूकीत संजयमामा शिंदे अपक्ष (७८८२२), नारायण आबा पाटील अपक्ष (७३३२८), रश्मी बागल शिवसेना (५३२९०) तर नोटा (१५९७) आमदार संजयमामा शिंदे यांनी ५४९४ मतांनी विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभा गाठली. संजयमामा शिंदे यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा धक्कादायक पराभव केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page