06/06/2025

मराठा आरक्षणासाठी करमाळ्यात माजी नगरसेवकाने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

0
IMG_20240823_135254.jpg

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या अनेक जणांकडून एकापाठोपाठ एक अशा आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे (वय-८०, रा. कानाड गल्ली, करमाळा) यांनी ‘मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

शहरातील बलभीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्षे नगरसेवक राहिलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने ते उद्विग्न होते. त्यामुळे त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे माझी कोणतीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनास आले.

त्यानंतर करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक ती कार्यवाही करून राखुंडे यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची माहिती कळताच राखुंडे यांच्या कानड गल्ली येथील घराभोवती तसेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मराठा समाजासह शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी गर्दी केली.

माजी नगरसेवक बलभीमदादा राखुंडे यांच्या पाठीमागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे पंतवंडे असा परिवार आहे. शवच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page