मुलगी देता का मुलगी? या लग्नाळू तरूणांच्या मोर्चातून मिळाला सामाजिक काम करण्याचा संदेश ; लव्हे येथील आबा सरक जुळवितात मोफत विवाह

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)-
लग्न जमत नाही म्हणून सोलापूरात निघालेल्या लग्नाळू तरूणांचा ‘मुलगी देता का हो मुलगी? हा मोर्चा डोळ्यांनी पाहिल्यानंतर ह्या ज्वलंत प्रश्नावर काहीतरी सामाजिक कार्य करता येईल असा संकल्प करून लव्हे (ता. करमाळा) येथील राजाराम उर्फ आबा सरक यांनी मोफत सर्वधर्मीय विवाह जुळविण्याचा निश्चय केला आणि तो आजही सुरू आहे.
करमाळा तालुक्यातील लव्हे येथील आबा सरक यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याचे ध्येय होते. समाजामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करून दाखवण्याची इच्छा काही वर्षांपूर्वी सोलापूरात निघालेल्या नरदेव मोर्चातून पूर्ण करण्यास सुरूवात झाली.
विवाह जुळवणे तसे पाहिले तर सोपे काम नाही परंतू समाजसेवा करण्याच्या उद्देशाने आबा सरक यांनी श्रीदत्त भटक्या जाती जमाती बहुउद्देशीय संस्था स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विवाह जुळवले आहेत. विशेष म्हणजे ते सर्वधर्मीय हे विवाह जुळवतात तेही कोणतेही पैसे न घेता. मुलींसाठी पूर्णतः फ्री सेवा देत आहेत.
कर्मयोगी कै. गोविंद बापू पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी दोन वर्षांपासून विवाह जमवायला सुरुवात केली आज पर्यंत त्यांच्या हातून तब्बल ७५ विवाह जुळलेले असून आता त्यांनी जेऊर गावांमध्ये आपले एक ऑफिस तयार केले आहे. या आॕफिसात एकूण सात जणांची टीम कार्यरत आहे.
जेऊर येथील आॕफिसात लोक येऊन विवाह जमवत आहेत त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र आहे. त्यांच्या संस्थेमध्ये डॉक्टर, इंजिनियर अशा उच्च पदस्थ मुला-मुलींचे लग्न जमविलेले आहेत. त्यांनी ऑनलाईन वधू वर सूचक केंद्र ही स्थापन केले आहे. हे संपूर्ण काम त्यांची सात जणांची टीम पाहते. आबा सरक हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत समाजामधल्या या गंभीर प्रश्नाची सोडवणूक ते करत आहेत.
सामाजिक कार्य करत असताना शासनाकडून त्यांना मदत मिळावी जेणेकरून विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, तसेच अंध-अपंग अशा जोडप्यांचे विवाह त्यांना सहज जुळवता येतील. आळंदीप्रमाणे कोर्ट मॅरेजही त्यांच्या या केंद्रामध्ये करता यावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरीय वधु वर सुचक मेळावा ते लवकरच घेणार आहेत विवाह जुळवण्याच्या कामात आबा सरक हे रात्रंदिवस झटत असतात आणि त्यातून अनेक जणांचे त्यांनी विवाह जुळवलेले आहेत.
त्यांच्या निरीक्षणा नुसार समाजामध्ये मुलींचे प्रमाण कमी नाही परंतु मुलींच्या वडिलांची अपेक्षा जास्त आहे त्यामुळे अनेक मुली आपल्या विवाहपासून वय वाढलेले असताना सुद्धा दूर राहिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मराठा समाजामध्ये हा एक गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे सर्व मुलींच्या वडिलांना नोकरदार व पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये राहणारा मुलगा हवा आहे परंतु शेतकरी हा सुद्धा कमी नाही हे ते मुलींच्या पालकांना समजावून सांगत असतात भविष्यात सरक हे अनाथआश्रम, वृद्धाश्रम व गोशाळा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
विवाह जमवण्याचा या कामाचे आपणास अंतरिम सुख मिळत असल्याचे आबा सरक यांनी बोलून दाखवले असून कुणाला जर विवाह जुळवायचे असतील तर पुढीलप्रमाणे संपर्क साधावा
श्री कर्मयोगी वधू-वर सुचक विवाह नोंदणी केंद्र, जेऊर. मोबाईल-9850014160 / 8999124969