06/06/2025

संजयमामा शिंदे यांच्या गटाची ‘पॕक-अप’ ची वेळ झाली ; शिंदे गटाचे आगामी जि.प व पं.स निवडणुकीनंतर करमाळा तालुक्यातील अस्तित्व संपणार- प्रवक्ते सुनील तळेकर

0
IMG_20240229_183341.jpg

जेऊर, दि.१६ (करमाळा-LIVE)- माजी आमदार संजयमामा यांचे करमाळा तालुक्यातील अस्तित्व संपले असल्याने शिंदे गटास जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन केले गेले, यामागे शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भुमिका नव्हती, असा हल्लाबोल आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.

दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामांबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की मुळात विधानसभा आणि आदिनाथ कारखाना या दोन्ही निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः उभे होते परंतू जनतेने त्यांना दोन्ही वेळेस नाकारुन पराभूत केले.

यामुळे आता करमाळा तालुक्यातील आपले अस्तित्व संपणार या भीतीपोटी माजी आमदार संजयमामा शिंदे हे निद्रानाशाच्या गर्केत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना ते तालुकापातळीवर निवडूण आणू शकत नाहीत हे सिद्ध झाल्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर आपला बाडबिस्तारा गुंडाळून आपल्याला माढा तालुक्यातच परत जावे लागेल ही भीती माजी आमदार संजयमामा शिंदे यांना वाटू लागली आहे. यामुळे आता राजकीय इच्छा उरलेल्या अतृप्त कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या करवी ते आमदार नारायण आबा पाटील यांना बदनाम करु पाहत आहेत.

मुळात सन २०२० पासून भुसंपादन प्रक्रिया बंद झाली व तसा शासन निर्णय पारित झाला. यामुळे २०१७ पासून उपसा सिंचन योजना बंदिस्त करण्याचा शासन निर्णय पारित आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करु नये. त्यावेळी बंदिस्त पाइपलाइन करणे हे काम प्रायोगिक तत्त्वावर होते. ही अट स्वीकारणे बंधनकारक नव्हते. संजयमामा शिंदे हे आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली नाहीत व केवळ १०१ कोटी रुपयाच्या या योजनेत आपण आडवा हात मारु शकतो हा आत्मविश्वास बाळगुन त्यांनीच बंदिस्त पाईपलाईन या योजनेसाठी लादली.

तापी खोरे महामंडळातील धरणे ही लहान आहेत व त्यांची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने त्या खोऱ्यात बंदिस्त पाईपलाईन ही संकल्पना काही उपसा सिंचन योजनेसाठी राबवली गेली. उजनी हे भीमा खोऱ्यातील मोठे धरण आहे व याची पाणी साठवण क्षमता ११५ टीएमसी इतकी आहे. यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन करुन फार तर २०० एम सी एफ टी पाणी वाचवता येईल. करमाळा तालुक्यातील काही तलावांची क्षमता यापेक्षा जास्त आहे. यामुळे खर तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १.८० टीएमसी ऐवजी ३० टीएमसी पाणी आरक्षित केले जावे ही मागणी संजयमामा शिंदे यांनी करायला हवी होती.

आता या योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन कामाच्या खोल मुळाशी आम्ही जाणार आहोत व येत्या आठवडाभरात यातील आर्थिक भ्रष्टाचार जनतेसमोर पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत. यामुळे शिंदे गटाकडून होत असलेल्या या आंदोलनाची शेतकऱ्यांनी तर दखल घेतली नाहीच पण आम्हीही फारसे गांभीर्याने याकडे पाहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटास जर पक्षाचा एवढा पुळका आज वाटत असेल‌ तर या पक्षाची उमेदवारी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजयमामा शिंदे यांनी घ्यावी असा आग्रह केल्यावर सुध्दा शिंदे यांनी ती का नाकारली हे जनतेला सांगावे व संजयमामा शिंदे यांंच्या विरोधात एकदा रस्त्यावर उतरावे असा मार्मिक टोला प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page