06/06/2025

कुछ तो गडबड है! दहिगावं उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव मंजूर करुन घेताना फार मोठ्या राजकीय तडजोडी व पाणी व्यवहार- प्रवक्ते सुनील तळेकर

0
1001558861.jpg

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव मंजूर करुन घेताना फार मोठ्या राजकीय तडजोडी व पाणी व्यवहार झाला असल्याची शक्यता आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, सन २०१९ ते २०२४ दरम्यान दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरण पध्दतीत बदल करण्याची व बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळावे यासाठी उर्वरित काम हे सुद्धा बंदिस्त पाईपलाईन अंतर्गत व्हावे अशी मागणी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी केली.

वास्तविक पाहता यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली नाहीत. बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी दिल्यास पाण्यात बचत होईल एवढे एकच कारण त्यांनी जाहीर केले.आजही ते हेच कारण सांगत आहेत. परंतु कामामागे काही घडामोडी दडल्या असल्याची दाट शक्यता आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी उजनीतुन १.८० टि एम सी इतके पाणी राखीव आहे. अजून ही योजना पूर्ण झाली नसल्याने नाममात्र पाणी उजनीतून उचलले जाते व शिल्लक पाणी कोण घेते याची माहिती उपलब्ध नाही. लवादाच्या निर्णयानुसार उजनीच्या पाण्याचे पुर्ण वाटप झाले आहे. यातील एक थेंबही पाणी आता वाटप आराखड्या बाहेर जाऊन घेता येत नाही. यामुळे मग नवीन उपसा सिंचन योजनेसाठी उजनीत पाणी उपलब्ध नाही.

अशातच इंदापूर तालुक्यातील एका नवीन उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सन २०१९ ते २०२४ मध्ये मंजूर झाला. आणि याच वेळेस दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामास मंजूरी दिली गेली. बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी दिल्यास दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या १.८० टि एम सी या हक्काच्या पाण्यातील काही पाणी शिल्लक राहणार असे गणित मांडुन सदर शिल्लक पाणी हे तालुका बाहेरील इतर नियोजित उपसा सिंचन योजनेसाठी देण्याच्या तडजोडी झाल्या का ही बाब तपासणे गरजेचे आहे.

जर असे ठरले असल्यास बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देऊन शिल्लक राहीलेले पाणी इतर योजनेस दाखवून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काच्या पाण्यात तुट येणार आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी राखीव असलेले पाणी कमी होऊ शकते. लवादाच्या निर्णयावर तोडगा म्हणुन तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांना माहिती न‌ देता शासन दरबारी दाखल केला असावा अशी शक्यता नाकारता येणार नाही. उजनीतून इंदापूर तालुक्यातील नियोजित लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस संपुर्ण सोलापूर जिल्ह्याने विरोध केला होता. तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी सुरुवातीस यावर बघ्याची भुमिका घेतली पण नंतर जनरेटा पाहून यास वरवरचा विरोध केला.

ही योजना स्थगित झाल्याचे आदेश स्वतः तत्कालीन आमदार संजयमामा यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दाखवले. पण तरीही हि याच कालावधीत योजना मंजूर झाली. यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम पाहता बंदिस्त पाईपलाईन काम व उजनीच्या पाण्यातील तडजोडी यात काही समान धागे सापडतात का हे पाहणे गरजेचे आहे. यामुळेच बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना झाकुन ठेऊन झाला का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे असल्याचे सांगत प्रवक्ते सुनील तळेकर यांनी या प्रकरणात राजकीय तडजोडी दडल्या असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page