करमाळा तालुक्यातील पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी सत्तेत दाखल ; आता युतीच्या नीतीवरच करमाळ्याचे भवितव्य, आगामी विधानसभेला बंडखोरी होणार हे निश्चित


जेऊर, दि. २८ (गौरव मोरे)-
करमाळ्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या नीतीवर अवलंबून असून पारंपारिक पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यात चौरंगी लढत होणार असून बंडखोरी निश्चित होणार आहे. काल बागल गट भाजप मध्ये प्रवेश केला असून तालुक्यातील सर्व पारंपरिक प्रतिस्पर्धी आता सत्तेत दाखल झालेले असले तरी आगामी विधानसभेला करमाळ्यातून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगतप, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल किंवा दिग्विजय बागल यांची नावे चर्चेत आहेत.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलेले आहे, 2019 ला भाजप-शिवसेना सत्तेत येऊनही महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अडीच वर्षांनंतर परिस्थिती बदलली, शिवसेना फुटली अन् शिंदे गटाने भाजप-शिवसेना बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, एक वर्षांनंतर राष्ट्रवादी फुटली आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. या घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

करमाळा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी सध्याची भुमिका जरी स्पष्ट केलेली नसली तरी युतीच्या नीतीवर सगळे भवितव्य अवलंबून आहे. सध्या आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी (अजित दादा गट), माजी आमदार नारायण आबा पाटील (शिवसेना, शिंदे गट), माजी आमदार जयवंतराव जगताप (भाजप), मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल आणि रश्मी बागल (भाजप) असे सर्व राजकीय नेते सध्या सत्तेत आहे. लोकसभा निवडणूकीत हे सर्व एकत्र दिसतील परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभ चौरंगी होणार हे जवळजवळ निश्चित असून बंडखोरी हे जवळजवळ निश्चित आहे.
विधानसभा निवडणूकीला अजून दहा महिने बाकी आहे. सध्यातरी शिवसेना (शिंदे गट)-भाजप- राष्ट्रवादी(अजित दादा गट) यांच्या युतीच्या नीतीवर सगळ्यांचे भवितव्य अवलंबून असून सर्व नेत्यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे.
सध्यातरी आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी (अजित दादा गट) मध्ये आहेत, शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे सध्या शिंदे गटात आहेत, माजी आमदार जयवंतराव जगताप भाजप मध्ये तर काल बागल गटाचे नेते आणि मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल भाजपवासी होणार आहेत. युती कशीही झाली तरी पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यातच पारंपरिक लढाई होणार हे जवळजवळ निश्चित आहे कोण कुठल्या राजकीय पक्षातून लढणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
जर निवडणूक लागली अन् सध्याची शिंदे-फडणवीस-पवार युती झाली तर करमाळा मतदारसंघ कुणाच्या वाटेला येणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. जर शिंदे गटाला हा मतदारसंघ मिळाला तर माजी आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. असे झाले तर अजित दादा गटात असलेले आमदार संजयमामा शिंदे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. जर हा मतदारसंघ अजित दादा गटाकडे गेला तर आमदार संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळेल परिणामी माजी आमदार नारायण आबा पाटील बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
बागल गट जरी सध्या भाजप मध्ये दाखल झाले असले तरी आगामी विधानसभेला जर ही जागा शिंदे गट किंवा अजित पवार गटाला गेली तर बागल बंडखोरी करून लढण्याची शक्यता आहे, कारण भाजप सोबत येण्याअगोदर बागल राष्ट्रवादी मध्ये होते, त्यामुळं मविआ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून बागल यांनी निवडणूक लढविली तर वावगे ठरणार नाही. युतीतील तिढा वाढला अन् ऐनवेळी जागा भाजपला गेली तर माजी आमदार जयवंतराव जगताप किंवा दिग्विजय बागल यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, परिणामी आमदार संजयमामा शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील बंडखोरी करू शकतात.
एकंदरीत पहायला गेले तर सध्यातरी करमाळ्याचे राजकारण गुंतागुंतीचे झालेले असून नेते लोक संभ्रमात आहेत. शिंदे-फडणवीस-पवार युतीच्या नीतीवर अवलंबून असून कोण कुणाकडून लढणार हे गुलदस्त्यात असले तरी तालुक्यातील सर्व नेत्यांनी सध्यातरी संवाद दौरे युतीच्या नीतीवर अवलंबून ठेवून सुरू ठेवलेले आहेत.



