युतीच्या नीतीवर करमाळ्याचे भवितव्य ; पारंपारिक गटातच चौरंगी लढत होण्याची शक्यता तर बंडखोरी होणार हे निश्चित



जेऊर, दि. 30 (गौरव मोरे)-
करमाळ्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या नीतीवर अवलंबून असून पारंपारिक पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यात चौरंगी लढत होणार असून बंडखोरी निश्चित होणार आहे तर एक नेता पुन्हा महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेला करमाळ्यातून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण आबा पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची नावे चर्चेत आहेत.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलेले आहे, 2019 ला भाजप-शिवसेना सत्तेत येऊनही महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अडीच वर्षांनंतर परिस्थिती बदलली, शिवसेना फुटली अन् शिंदे गटाने भाजप-शिवसेना बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, एक वर्षांनंतर राष्ट्रवादी फुटली आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. या घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

करमाळा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी सध्याची भुमिका जरी स्पष्ट केलेली नसली तरी युतीच्या नीतीवर सगळे भवितव्य अवलंबून असून तालुक्यातील एक नेता पुन्हा महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता आहे. तर आगामी निवडणूक चौरंगी होणार हे जवळजवळ निश्चित असून यात दोन उमेदवारी बंडखोरी होणार आहे.
विधानसभा निवडणूकीला अजून एक वर्ष बाकी आहे. सध्यातरी शिवसेना (शिंदे गट)-भाजप- राष्ट्रवादी(अजित दादा गट) यांच्या युतीच्या नीतीवर सगळ्यांचे भवितव्य अवलंबून असून सर्व नेत्यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे.
शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे सध्या शिंदे गटात आहेत, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल सध्या ठाकरे गटात असल्या तरी त्यांची भुमिका अजून स्पष्ट नाही सध्या त्या बागल गटाच्या माध्यमातून कामे करीत आहेत, तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे अजित दादा गटाबरोबर आहेत तर माजी आमदार जयवंत जगताप हे सध्यातरी आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे ठाकरे गटात आहेत. युती कशीही झाली तरी पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यातच पारंपरिक लढाई होणार हे जवळजवळ निश्चित आहे कोण कुठल्या राजकीय पक्षातून लढणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
जर निवडणूक लागली अन् सध्याची शिंदे-फडणवीस-पवार युती झाली तर करमाळा मतदारसंघ कुणाच्या वाटेला येणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. जर शिंदे गटाला हा मतदारसंघ मिळाला तर माजी आमदार नारायण आबा पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यापैकी एकाची उमेदवारी जवळजवळ निश्चित होऊ शकते असे झाले तर विद्यमान आमदार आणि अजित दादा गटात असलेले आमदार संजयमामा शिंदे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतून रश्मी बागल किंवा वैभवराजे जगताप निवडणूक लढवू शकतात. जर हा मतदारसंघ अजित दादा गटाकडे गेला तर आमदार संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळेल परिणामी माजी आमदार नारायण आबा पाटील बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून माजी आमदार नारायण आबा पाटील हे भाजप मध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे. युती झाली तर करमाळ्याची जागा शिवसेनेची (शिंदे गट) असल्यामुळे माजी आमदार पाटील यांनी सावध भुमिका घेतलेली दिसून येत आहे तर दुसरीकडे युतीतील तिढा वाढला अन् जागा भाजपला गेली तर माजी आमदार श्री पाटील भाजप मधूनही लढण्याची दाट शक्यता आहे कारण अकलूज चे मोहिते-पाटील सध्या भाजप मध्ये आलेले आहेत. मोहिते-पाटील आणि श्री पाटील यांचे राजकीय संबंध चांगले असल्यामुळे आणि मागील विधानसभेला मोहिते-पाटलांनी नारायण आबा पाटील यांना चांगली मदत केलेली होती त्यामुळे शिंदे गटाला जागा गेली तर नारायण पाटलांना शिवसेनेकडून लढण्यात काहीही अडचण येणार नाही.
जर भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती तुटली अन् ऐनवेळी तर स्वतंत्र 288 जागा लढवाव्या लागतील या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिव रचना सुरू केली आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला तर पर्यायी उभा पर्यायी उमेदवार तयार करण्याचे निर्णय शिवसेनेच्या मुंबईतील बैठकीत झाला असल्याचे समजते. माजी आमदार नारायण पाटील हे मुंबईत गेले तर शिंदे समर्थक असतात करमाळ्यात आली की मोहिते समर्थक होतात. ही गोष्ट आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांचा आदिनाथ मधील प्रशासक मंडळातील पत्ता कट करून त्या ठिकाणी महेशं चिवटे यांना संधी देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न सावंत बंधूंनी केला आहे अशी चर्चा सुरू असून शिवाय तालुक्यातील रखडलेल्या रेटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात महेश चिवटे यांचे उपस्थित बैठक लावण्याचे सुरू प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनीही सावध भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या ठाकरे गटात असल्यामुळे त्यांची महाविकास आघाडीतून उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे परंतु माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे वैभवराजे जगताप ही विधानसभेचे दावेदार मानले जात आहे. अशातच रश्मी बागल ह्या खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये गेल्या तर काही वागवे ठरणार नाही, रश्मी बागल यांची महाविकास आघाडीकडून जरी उमेदवारी निश्चित असली तरी ऐनवेळी वैभवराजे जगताप यांना उमेदवारी मिळाली तर रश्मी बागल याही बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
एकंदरीत पहायला गेले तर सध्यातरी करमाळ्याचे राजकारण गुंतागुंतीचे झालेले असून नेते लोक संभ्रमात आहेत. शिंदे-फडणवीस-पवार युतीच्या नीतीवर अवलंबून असून कोण कुणाकडून लढणार हे गुलदस्त्यात असले तरी तालुक्यातील सर्व नेत्यांनी सध्यातरी संवाद दौरे युतीच्या नीतीवर अवलंबून ठेवून सुरू ठेवलेले आहेत.

