08/06/2025

केडगावं-शेटफळ रस्ता मोजतोय अखेरची घटका ; विद्यमान आमदारांना याची चिंता नाही, अर्थसंकल्प अधिवेशनात निधीच मागितला नाही- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

0
IMG-20240304-WA0038.jpg

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
केडगावं-शेटफळ रस्ता शेवटची घटका मोजतोय, आणि आमदार महोदयांना याची चिंता नसून अर्थसंकल्प अधिवेशनात करमाळा तालुक्यातील रस्त्यांना निधीच मागितला गेला नसल्याचा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.

याबाबत अधिक सविस्तपणे बोलताना श्री तळेकर म्हणाले की, केडगावं ते शेटफळ या रस्त्यामधील दीड किमी रस्त्याच्या तुकड्याची खूपच दुरवस्था झाली असून याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यमानावर होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना खूप खड्डे आणि उडणारी धूळ यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून सध्या दहावी बारावीच्या परीक्षा असताना विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी कितीतरी तास अगोदर घर सोडावे लागत आहे. चिखलठाण रस्ताही याहून वेगळा नाही.

यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी रस्त्याचे खरे प्रश्न अधिवेशनात मांडलेच नाहीत. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी रोडकिंग ही उपाधी दिली. आबांच्या सन २०१४ ते २०१९ या कालावधीत प्रत्येक अर्थ संकल्पीय अधिवेशनात सरासरी पन्नास कोटी रुपयांचा निधी हा मंजूर होऊन येत होता. याशिवाय पूरक मागण्यातून्ही पन्नास कोटींचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी खेचून आणण्यात माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे कायम यशस्वी ठरले आहेत. सन २०१९ नंतर मात्र अनेक भागातील तीन चार किमी अंतर असलेले अनेक रस्ते हे अत्यंत खराब झाले असून संपूर्ण प्रवासावर या खराब तुकड्यांचा परिणाम होतोय.

केवळ कोरोना काळाचे कारण सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्या आमदार संजय मामा शिंदे यांनी नंतरच्या अधिवेशनात तरी रस्त्याची किती कामे केली हे अशा केडगाव शेटफळ रस्त्यावरून दिसून येते. उजनीकाठच्या गावांवर आमदार शिंदे हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असून फ्लेमिंगो पक्षी आणि आमदार संजयमामा शिंदे हे फक्त पर्यटन करण्यासाठीच करमाळा तालुक्यातील या भागात येतात असा मार्मिक हल्लाबोल तळेकर यांनी केला. आमदार संजय मामा शिंदे यांनी चालू अर्थ संकल्प अधिवेशनात किती प्रश्न मांडले हे जरा एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगावे असे आव्हान तळेकर यांनी केले.तर केडगाव शेटफळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर नाही सुरू झाल्यास नागरिकावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये अशी विनंतीही तळेकर यांनी केली आहे. यावेळी पाटील गटाचे युवा कार्यकर्ते सुरज बोराडे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page