कुंभेज : समाजाचा विश्वास असणारी समाजातील देवमाणसं म्हणजे गुरु- प्रा. गणेश करे-पाटील


करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयात गुरुपौर्णिमा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, समारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. गणेश करे-पाटील उपस्थित होते तर अध्यक्षस्थान मुख्याध्यापक हनुमंत पाटील हे होते.
मान्यवरांचे शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि विद्यालयाचे संस्थापक लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सूरूवात करण्यात आली. यवेळी प्रणिता गुटाळ हिने अध्यक्ष निवड सूचना मांडली त्यास पायल शिंदे हिने अनुमोदन दिले तर तृप्ती कांबळे हीने प्रास्ताविक केले.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रा.करे- पाटील म्हणाले की, समाजातील देवमाणसांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या दिवशी आपल्या गुरूंप्रती आदर अन् सदभाव वाढावा यासाठी विद्यार्थ्यांनी विनयशिल होऊन प्रयत्न करावेत. गेलेला क्षण पून्हा येत नाही म्हणून आहे त्या क्षणांना सक्षमपणे सामोरे जा. उत्तम प्रकारे अभ्यास करून आपल्या यशाची पाऊलवाट निर्माण करावी असा संदेश त्यांनी दिला. तसेच विद्यार्थ्यांना उच्च संस्कार देणाऱ्या कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयातील विद्यार्थी भावी आयुष्यात आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च समाजसेवा करतील असा आशावाद व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील म्हणाले की, माता, पिता व शिक्षक हे आपले आद्य गुरु आहेत त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गानेच आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आयुष्यभर निर्व्यसनी राहीले तरच आपले ध्येय्य प्राप्त करता येऊ शकते व यशाला गवसणी घालता येते. हे सांगतानाच विद्यालयात येताना विद्यार्थ्यांनी आपले माता -पिता यांचे नियमित आशिर्वाद घेऊन आदर व्यक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रा. गणेश करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून ‘ मिशन स्मार्ट स्कूल करमाळा ‘ अंतर्गत यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून बागल विद्यालयास स्मार्ट टिव्ही संच भेट दिला. त्याबद्दल मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी प्रा.करे-पाटील यांचा विद्यालयाचे वतीने विशेष सन्मान केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले समृद्धी शिंदे, सूरज शिंदे, पूजा शिंदे, राजश्री वाघमारे, दिप्ती काळुखे, समिक्षा शिंदे, सानिका शिंदे, तनवी सातव, तृप्ती सातव, साक्षी मिसाळ, दिव्या पवार, समृद्धी पवार यांनी आपले मनोगतांतून गुरुची महती विषद केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिक्षा चांदणे व प्रतिक्षा कन्हेरे यांनी केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. यासाठी सिताराम बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून आशिर्वाद घेतले व आदरभाव व्यक्त करत गुरुपौर्णिमा साजरी केली.
विद्यालयातील सहशिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव यांनी आपण कसे घडलो हे सांगताना विद्यार्थ्यांना गुरूंचे आपल्या जीवनातील स्थान किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सेवकवृंद किशोर कदम, बलभीम वाघमारे, नंदकुमार कांबळे, संतोष घोरपडे यांनी परिश्रम घेतले.
