सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हीच खरी स्व. सुभाष अण्णांना श्रद्धांजली- शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे



करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
सर्वसामान्य वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडताना त्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करताना स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांनी राजकीय नफा नुकसान याचा कधीही विचार केला नाही किंबहुना अनेक वेळा सर्वसामान्यांना न्याय देताना सावंत यांचे वैयक्तिक राजकीय आर्थिक नुकसान झाले तरीसुद्धा त्यांनी सर्वसामान्यांची बाजू सोडली नाही यामुळे सर्वसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणे हीच खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांना श्रद्धांजली ठरेल असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर जिल्हाप्रमुख महेश चिवटे बोलत होते. हमाल पंचायत चे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अॕड राहुल सावंत, जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, नगरसेवक राजेंद्र आव्हाड, दलित चळवळीचे नेते देवा लोंढे, भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे, आदिनाथ बचाव समितीचे निमंत्रक व शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवानंद बागल, कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, ग्रामपंचायतचे सरपंच महेश सोरटे, विजयराव चव्हाण, मनोज राखुंडे, दादा इंदुलकर आदी जण उपस्थित होते.
स्व सुभाष अण्णा सावंत यांनी ऊसाचे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्याच्या विरोधात अनेक आंदोलने करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. कुकडीचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील आदिनाथ कारखान्यातले प्रश्न असतील या प्रश्नावर त्यांनी रोखठोक आंदोलने केली. आज करमाळा तालुक्यातील कारखाने उसाचे पैसे देत नाहीत तरीसुद्धा कोणी आंदोलन करत नाही याबद्दल आदिनाथ बचाव समितीचे निमंत्रक देवानंद बागल यांनी खंत व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी सुभाष सावंत यांच्या अनेक राजकीय सामाजिक आठवणी सांगितल्या.
