कोंढेजचे सुपुत्र ‘एव्हरेस्ट वीर’ शिवाजी ननवरे यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा- सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची मागणी




करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील एव्हरेस्ट वीर शिवाजी ननवरे यांचा यथोचित सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा अशी मागणी विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यानी आज विद्यापीठाकडे समक्ष भेटून केली.
या बाबत श्री बंडगर म्हणाले की, शिवाजी ननवरे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या भारत महाविद्यालय, जेऊर या महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत. शिवाजी ननवरे यांची एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी ही विद्यापीठाला अभिमानास्पद, भूषणावह आहे. एखाद्या माजी विद्यार्थी एखादी सर्वोच्च कामगिरी करतो तेव्हा त्या संस्थेच नाव करत असतो. त्यामुळे विद्यापीठाने सन्मान केल्यास ननवरे यांचा खरा गौरव होईल.
विद्यापीठ कुलगुरु राजन कामत यांनी हा विषय चांगला असून ननवरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले व विद्यापीठाच्या दृष्टीने आनंदाची बाब असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलगुरू डाॅ गौतम कांबळे यानी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी ढोकरी येथील कार्यकर्ते काका पाटील उपस्थित होते.

दरम्यान करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी दिनांक 17 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता जगातील सर्वात उंच ठिकाणी माउंट एव्हरेस्ट येथे भारताचा तिरंगा झेंडा रोवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे आणि ते ज्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत घेत होते ते स्वप्न साकार झाले. ही कामगिरी करणारे ते सोलापूरचे पाहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एव्हरेस्टवीर असून पुणे ग्रामीण पोलीसचे पाहिले एव्हरेस्ट वीर आहेत. शिवाजी ननवरे यांना गड किल्ले सर करण्याची आवड असल्याने अनेक मोहिमेत ते यशस्वी झाले आहेत.त्यांचे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न होते. त्यांनी यापूर्वी लेह-लडाख मधील कांग्यासे-दोन 6250 मीटर, स्टोक कांग्री 6100 मीटर, पतलासू 4200 मीटर तसेच मागील वर्षी एव्हरेस्ट कॅम्प ही ची मोहीम पूर्ण केली होती.
या मोहिमेसाठी ते 6 एप्रिल रोजी रवाना झाले. 18 एप्रिल रोजी त्यांनी बेस कॅम्प गाठला. त्यानंतर पुन्हा चढाई सुरू करत ते 15 मे रोजी बेस कॅम्प तीन येथे पोहचले. त्यानंतर 16 मे च्या रात्री शेवटची चढाई करत त्यांनी 17 मे रोजी सकाळी ननवरे यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला आणि सोलापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.


