नव्याने सुरू होणाऱ्या पुणे-लातूर इंटरसीटी एक्सप्रेसला जेऊर स्टेशनवर थांबा द्यावा- प्रवासी संघटनेची मागणी



जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
नव्याने सुरू होणाऱ्या पुणे-लातूर इंटरसीटीला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.
पुणे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर ते पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे. दरम्यान या गाडीला जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर रेल्वे विभागातील कुर्डुवाडी नंतर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे आणि दळणवळण साठी सोयीस्कर असलेले जेऊर रेल्वे स्टेशन आता जेऊर परिसरातील नागरीकांसाठी अडचणीचे झालेले आहे, ना गाड्यांना थांबा मिळत आहे, ना रेल्वे बोर्ड जेऊरकरांच्या अडचणी समजून घेत आहे. जेऊर हे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असून जेऊर रेल्वे स्टेशनला करमाळा, इंदापूर, जामखेड, कर्जत, परांडा, भूम असे सहा तालुके जोडलेली असून या तालुक्यांसाठी जेऊर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु मोजक्याच गाड्या जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
एवढे मोठे दळणवळणाचे जाळं असताना जेऊर रेल्वे स्टेशनवर फक्त हैद्राबाद एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस आणि चेन्नई मेल, इंद्रायणी एक्सप्रेस ह्या चार एक्सप्रेस गाड्या तर पुणे-सोलापूर डेमो एवढ्याच गाड्यांचा थांबा आहे. सध्या जेऊर वरून पुण्याला जायचे झाले तर सकाळी 6.10 वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे त्यानंतर नऊ तासांनी दुपारी 3.30 वाजता सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आहे तर तिथून नऊ तासांनी रात्री 11.30 ला चेन्नई-मुंबई एक्सप्रेस गाडी आहे म्हणजेच जवळजवळ नऊ तासांचे अंतर तीन गाड्यांमध्ये आहे. या व्यतिरिक्त एक ही रेल्वे गाडीचा थांबा जेऊर रेल्वे स्टेशनवर नसल्यामुळे येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेऊरकरांच्या समस्या आणखीनच वाढलेल्या आहेत.
नव्याने सुरू होणाऱ्या पुणे-लातूर गाडी थांबली तर प्रवाशांची सोय होणार आहे, तसेच रेल्वे उत्पन्नात वाढ होणार आहे.

