रिटेवाडी योजना मार्गी लावावी-माजी आमदार नारायण पाटील यांची आग्रही मागणी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना मार्गी लावण्याचे दिले आश्वासन


जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील, आमदार राम शिंदे, संचालिका रश्मी बागल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिटेवाडी योजना, ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. यामुळे तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल.
माजी आमदार नारायण आबा पाटील यांची 2014 पासून असलेल्या मागणीचा उल्लेख करून रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गेली अडीच वर्षात महाराष्ट्रात एकाही उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आलेली नाही. परंतु करमाळा तालुक्यात रिटेवाडी उपसा सिंचन सारखी योजना राबवला तर तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे यासाठी तात्काळ जलसंपदा विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
