गेल्या बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही, नेता म्हणून संजयमामा फेल तर विधानसभा व आदिनाथ निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करावे- प्रवक्ते सुनिल तळेकर

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
गेल्या बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही, नेता म्हणून संजयमामा फेल असल्याचा दावा आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनलने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनलचा सर्व उमेदवारांना पराभुत करुन विजय संपादन केला. यावर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की, संजयमामा शिंदे हे बारा वर्षे झाले करमाळा तालूक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. परंतू या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी शिंदे गटाचे नेतृत्व करत असताना एकाही कार्यकर्त्याला तालूकापातळीवरील निवडणुकीत विजय मिळवून दिला नाही. ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. आजपर्यंत करमाळा पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदिनाथ व मकाई कारखाना या तालुक्यातील महत्वाच्या सत्तेत शिंदे गटाचा एकही पदाधिकारी निवडून आलेला नाही.
यावरुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. या उलट आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा पंचायत समिती सभापती, उपसभापती तर जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच आता आदिनाथ कारखाना या महत्वांच्या ठिकाणी करमाळा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन स्वतः प्रचार करुन निवडून आणले. माजी आमदार संजयमामा शिंदे हे सध्या स्वतः निवडून येण्यास असमर्थ आहेतच पण ते आपल्या स्वतःच्या गटातील कार्यकर्ता निवडुन आणण्यात सुध्दा अपयशी ठरले आहेत. तालुक्यातील वरीष्ठ नेते मंडळी बारा वर्षापुर्वी तालूक्यातील महत्वाच्या पदावर असताना शिंदे गटात आलेली आहेत.
आज बारा वर्षे झाली तरी केवळ संजयमामा शिंदे यांची पालखी वाहण्यातच कार्यकर्त्यांनी किती वर्षं धन्यता मानायची हा महत्त्वाचा प्रश्न उरुन राहत आहे. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःला सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणे सोडून द्यावे. मोहिते-पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, दुध संघ अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री पदापर्यंत पोहचवले आहे. यामुळे संजयमामा शिंदे यांनी उगीच मोहिते पाटील यांची बरोबरी करणे सोडुन द्यावे. कुठे तरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभा व आदिनाथ या दोन्ही निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करावे असा मार्मिक टोलाही सुनिल तळेकर यांनी लगावला.