ग्रामपंचायत निवडणूकीचा डाव पाटलांनी जिंकला; करमाळा तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतवर पाटील गटाची सत्ता


करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आमदार नारायण पाटील गटाने बाजी मारली असून तीस ग्रामपंचायती पैकी तब्बल एकोणीस ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे.
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात एकुण 30 ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा समावेश होता. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज करमाळा तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यानंतर पाटील गटाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील जनतेचा आजही आपल्यावर विश्वास कायम असून ग्रामपंचायतीच्या स्थानिक निवडणूकात आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगले यश संपादन केले आहे.
पाटील गटाची वरकटणे, गोयेगाव, हिंगणी, शेलगावं (वांगी), जिंती, पोंधवडी, अंजनडोह, वंजारवाडी, कामोणे, दहिगाव, दिवेगव्हाण, रिटेवाडी, तरटगाव, मोरवड, सोगाव, विहाळ, भिलारवाडी, पोपळज व पारेवाडी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन झाली असून या गावातील जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत व इतर खात्यातील मंत्रीमहोदय यांचे माध्यमातून ग्रामविकासाठी भरघोस निधी मिळवून देऊन संबंधित गावातील आरोग्य, रस्ते, स्वच्छता, कृषी, शिक्षण आदिसह अनेक मुलभुत सुविधां मिळवू देणे या उद्देशाने आपण वरीष्ठ पातळीवर निधीची मागणी व कामांचा पाठपुरावा करत राहणार असल्याचे ठामपणे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
तसेच या यशाबद्दल संबंधित गावातील जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते व मतदार यांचेही त्यांनी अभिनंदन या प्रतिक्रिया मधून केले. आज जेऊर येथील माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयात विविध गावच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करुन गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.

