तीस ग्रामपंचायतींचा महासंग्राम : करमाळ्यात ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार आगामी मोठ्या निवडणुकांची रंगीत तालीम


जेऊर, दि. 2 (गौरव मोरे)-
करमाळा तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील तीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला असून, करमाळा ऐन थंडीत तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील तसेच बागल गटाच्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप हे नेते पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने ही निवडणूक शेरास सव्वा शेरप्रमाणे होणार आहे. कारण येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच बरोबर दोन वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक आगामी मोठ्या निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून पहावयास मिळणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत करमाळा तालुक्यातील देलवडी, भिलारवाडी, दिवेगव्हाण, जिंती, कामोणे, कोंढारचिंचोली, पारेवाडी, पोफळज, गोयेगावं, हिंगणी, कुंभारगाव, पोमलवाडी, रिटेवाडी, सोगावं, वाशिंबे, दहिगावं, खडकी, खतगाव, टाकळी, तरटगावं, कात्रज, लिंबेवाडी, अंजनडोह, मोरवड, वंजारवाडी, पौंधवडी, विहाळ, वरकटणे, शेलगावं(वां), मांजरगाव आदी तीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका जाहीर झालेल्या आहेत.

सध्यातरी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहेत. सध्या पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट अशा प्रकारे गटाने निवडणूक लढविली जात आहे. सध्या तालुक्यातील ग्रामपंचायतवर ह्याच गटांची सत्ता आहे.
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायती स्थापनेपासूनच कॉंग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना असे अनेक गावात बागल, जगताप, पाटील, शिंदे गटाचे नेते परंपरागत स्थानिक गट म्हणूनच या निवडणूका लढविलेल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटांच्या नेत्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप हे पूर्ण ताकतीने ग्रामपंचायत निवडणूकीत एकमेंकाच्याच विरोधात लढण्याची शक्यता आहे. सध्या चार ही गट स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आगामी मोठ्या निवडणूकांची तयारी करताना पाहायला मिळणार आहे.
सध्यातरी थंडीच्या वातवरणात गावागावात राजकीय वातावरण तापत चालले आहे. हे मात्र निश्चित.
थेट सरपंच निवडीमुळे चुरस.
यंदाही सरपंचपद हे थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने अनेक गावात या पदासाठी मोठी चुरशींची लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे गावात जर सतरा सदस्य असतील तर सरपंचपदाची जागा ही स्वतंत्रपणे निवडून दयायची आहे. त्यामुळे प्रत्येक गावात एक जागा आपोआप वाढणार आहे.
ग्रामपंचायत ठरविणार आगामी मोठ्या निवडणूकांचा कौल
तीस ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवून याठिकाणी आगामी जि.प, पं.स आणि विधानसभेला आपली ताकद आणखीन बळकट करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील प्रयत्नशील आहेत. तर येणारी जि.प, पं.स आणि विधानसभा निवडणूक सोपी जाण्यासाठी तिची मोर्चेबांधणी करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल प्रयत्नशील आहेत तसेच आपल्या गावपातळीवरील समर्थकांना ताकद पुरवून माजी आमदार जयवंत जगताप आव्हान निर्माण करतील की मागील तीन वर्षांप्रमाणे यावेळीही आमदार संजयमामा शिंदे यांच्या बरोबर जातील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल तर दुसरी कडे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे विधानसभा निवडणूक प्रमाणे यावेळीही करिष्मा करून करून दाखवणार हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

