माढा तालुक्यातील ३६ गावातील रस्ते, वीज, सिंचनाचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एक संधी द्या – माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
माढा तालुक्यातील ३६ गावातील रस्ते, वीज व सिंचन हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मला एक संधी दिल्यास या भागाचा कायापालट करून दाखवेन असा ठाम विश्वास माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला.
पापणस व रिधोरे येथील गावभेट झाल्यानंतर तांदूळवाडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच कुबेर बप्पा गवळी होते तर यावेळी व्यासपीठावर दत्तात्रय गायकवाड, भारत बापू गायकवाड, रामभाऊ जगताप, नागनाथ कदम, राजाभाऊ गवळी, राजाभाऊ शिंदे, बिनु मालक जाधव, विपुल भोसले, दिलीप गवळी, शांतीलाल गवळी, आबा गवळी, तुकाराम गवळी, दिगंबर गवळी, इंद्रजित भोसले, बाळासाहेब कदम, अमोल गवळी, दत्ता आबा गवळी, प्रताप तात्या भोसले यांचेसह माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, माजी सभापती शेखर गाडे, माजी सरपंच तात्या गोडगे, हर्षल वाघमारे, अतुल पाटील, माजी सदस्य विनोद गरड, स्वीय सहायक सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले कि सन २०१४ ते २०१९ मध्ये मी प्रामाणिकपणे माढा तालुक्यातील ३६ गावांना विकास कामासाठी निधी देताना झुकते माप दिले. यातून काही भागात रस्ते, सभामंडप, गाव अंतर्गत रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, नदी वरील बॅरेंज, रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्य निधी यासह अनेक कामे केली. आता परत एकदा तुम्ही मतदारांनी विकासाला प्राधान्य देऊन मला तुमची सेवा करण्याची संधी दिल्यास मी तुमचा सेवक या नात्याने विधानसभेत तुमचे प्रश्न मांडून व मंत्रालयीन पातळीवर अधिकारी व सचिव यांच्या उपस्थिती मध्ये बैठक लावून तुमचे प्रलंबित प्रश्न सोडवून दाखवेल. बोगद्या काठाच्या लाभधारक शेतकऱ्यांना केवळ आवर्तन काळापुरतेच पाणी देऊन भागणार नाही तर वर्षभर कायमस्वरूपी या बोगद्यात पाणी राहावे म्हणून उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे.
या भागातील रस्त्यांची दुरावस्था दूर करू पाच वर्षात सर्व गावे एकमेकांना भक्कम डांबरी रस्त्याने जोडली पाहिजेत या कामासाठी आपण प्राधान्य देऊ पण आता परिवर्तन करण्यासाठी तुमची मला साथ हवी. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जनतेच्या प्रतिसादातून बोलले जाते याचा अनुभव या छत्तीस गावाच्या दौऱ्यात लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आला आहे.
तांदुळवाडी ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पाठीशी उभारून मतदार संघातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेऊन मतांचे दान आपल्या झोळीत टाकावे अशी साद यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि युवकांना घातली.
प्रास्तविक व सूत्रसंचालन राजाभाऊ गवळी यांनी केले तर आभार बिनु मालक जाधव यांनी मानले.