जेऊर येथे सुरू होणार बी.एसस्सी कॉलेज ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची मंजुरी


चिखलठाण, दि. २७ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील जय मातृभुमी शैक्षणिक व सांस्कृतिक संघाच्या शास्त्र शाखेच्या अटल ज्ञानवर्धिनी महाविद्यालयास इरादा पत्र मिळाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन मेहता व सचिव प्रसन्न बलदोटा यांनी दिली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय जेऊर येथे सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी तालुक्याबाहेर जावे लागत होते.करमाळा तालुक्यातील जेऊर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शास्त्र शाखेचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजची मागणी अनेक दिवसापासून केली जात होती विशेषतः या परिसरातील मुलींच्या शिक्षणाची फारच गैरसोय होती.
शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय जारी केला असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाच्या अंतर्गत शासनाच्या धोरणानुसार कायम विनाअनुदानित तत्त्वावर हे महाविद्यालय सुरू करण्याबाबत इरादा पत्र मंजूर करण्यात आले. असून जानेवारी २०२५ पर्यंत ते वैध असणार आहे. सध्या या संस्थेत लहान शिशुवर्गांपासून दहावीपर्यंतचे वर्ग असून शास्त्र जनिअर कॉलेजला यापूर्वीच मान्यता मिळाली होती आता महाविद्यालयासही इरादा पत्र मिळाल्याने एकच ठिकाणी पदवीपर्यंत शिक्षणाची सोय होणार आहे.



