करमाळ्याचा वीस वर्षांपासूनचा इतिहास कायम राहणार? ; विधानसभेला महायुतीत बंडखोरी निश्चित तर नारायण पाटलांचे पारडे जड

करमाळा, दि. १२ (गौरव मोरे)-
करमाळा मतदारसंघाचा वेगवेगळ्या प्रकाराचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्यातरी आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. यावर्षीच्या विधानसभेत वीस वर्षांपूर्वी पासून सुरू असलेला इतिहास पुन्हा एकदा कायम राहण्याची शक्यता असून करमाळ्यात पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मविआ कडून लढणारे नारायण आबा पाटील यांचे पारडे जड असून नारायण आबा पाटील पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे, याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य तसेच स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दल ची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, महायुतीत होणारी बंडखोरी, यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग सध्या सुसाट पहायला मिळत आहे.
वर्तमान इतिहास पहायचा झाला तर
सध्या महायुतीकडून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट), भाजप नेत्या रश्मी बागल (भाजप), शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे (शिवसेना शिंदे गट) या तिघांची नावे चर्चेत आहेत. तिघांपैकी कुणा एकाला उमेदवारी मिळाणार असून महायुतीत बंडखोरी होणार जवळजवळ निश्चित आहे त्यामुळे महायुतीला डोकेदुखी होणार आहे, बंडखोरी मुळे मतविभागणीचा फटका बसणार आहे तर मविआ कडून नारायण आबा पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली असल्यामुळे मविआ चा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे. मविआ मध्ये बंडखोरी होणार नाही याचा फायदा नारायण आबा पाटलांना होणार आहे. तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे, मागील विधानसभेला आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता, याचा फायदा आमदार शिंदेंना झाला होता. माजी आमदार जगताप हे सध्या आमदार शिंदे यांच्यापासून दूर आहेत. स्वतःहा निवडणूक लढविणार की, सुपुत्र शंभूराजे जगताप यांना उभे करणार की, शिंदे अथवा पाटील यांना पाठिंबा देणार हे लवकरच समजेल.
जेव्हा-जेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा-तेव्हा सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणूकीवर लागलेले असते. सध्या तालुक्यात पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर १९९९ नंतर प्रत्येक विधानसभेला नवा चेहरा निवडून येत आहे. १९९९ ला कै. दिगंबरराव बागल अपक्ष निवडून आले होते, २००४ मध्ये शिवसेनेकडून जयवंतराव जगताप आमदार झाले होते, २००९ मध्ये राष्ट्रवादी कडून माजी आमदार श्यामल बागल निवडून आल्या होत्या, २०१४ मध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नारायण आबा पाटील निवडून आले होते तर २०१९ ला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडून आले आहेत.
करमाळ्याचा मागील इतिहास पाहिला तर राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्यावेळी करमाळ्यातील जनतेने विरूद्ध कौल दिल्याचा इतिहास आहे १९७८ साली राज्यात जनता दलाची लाट त्यावेळी पाच उमेदवार होते. कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (३१५८७ मते) जनता दलाचे गिरधरदास देवी (२७१०१ मते) यांचा पराभव केला होता. १९८० साली राज्यात व देशात इंदिरा कॉंग्रेसची राज्यातील लाटेच्या विरूद्ध कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (२०००६ मते) यांना निवडून दिले. तर पुढे १९८५ साली कॉंग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले पण याच मतदारांनी कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप यांना पराभूत केले. त्यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना (३४५०० मते) निवडून दिले. तर जगताप यांना (२३९५६ मते) पडली होती.
तसेच १९९० साली देशात जनता दलाची सत्ता होती. त्यावेळी जनता दलाकडून रावसाहेब पाटील उभे होते त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांची करमाळा येथे सभा होऊनही अपक्ष उमेदवार जयवंत जगताप (३५७६२ मते) यांनी जनता दलाचे उमेदवार रावसाहेब पाटील (२०६७० मते) यांचा पराभव केला होता.
त्यानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी अपक्ष उमेदवार कै. दिगंबरराव बागल (४५४२३ मते) यांनी कॉंग्रेसच्या जयवंतराव जगताप (४१४८५ मते) यांचा पराभव केला होता. तर युतीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. १९९९ साली युती विरूद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे लढले अपक्ष उमेदवार कै दिगंबरराव बागल (४३७८७ मते) यांनी कॉंग्रेसचे उमेदवार जयवंत जगताप (४३१०६ मते) आणि प्रथमच निवडणूक लढविणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील (१२५०७ मते) यांचा पराभव केला.
२००४ मध्ये राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्रट्विस्ट आला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली या निवडणूकीत १९९९ निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली आणि नेहमी प्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरूद्ध कौल दिला शिवसेनेचे जयवंत जगताप (६२६९२ मते) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कै दिगंबरराव बागल (५९०५२ मते) यांचा पराभव केला.
२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे २००६ साली आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. तर २००४ निवडणूकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टी कडून निवडणूक लढविली तर त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून समाजवादी पार्टी कडून निवडणूक लढविली. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्यामल बागल (७०९४३ मते) घेऊन जनसुराज्य चे नारायण पाटील (४३१२६ मते) आणि समाजवादीचे जयवंतराव जगताप (२५४११ मते) यांचा पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत पाटील यांनी केवळ (१३८१५ मते) पडली.
या निवडणूकीत प्रथमच ३१ वर्षांचा इतिहास पुसला गेला तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्ष्याचे सरकार त्या उमेदवाराला कौल दिला.
२०१४ विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. आतापर्यंतचे इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहामीच गटातटाचे राजकारण घडले पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्याचा आमदार संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर कॉंग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील (६०६७४ मते) घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल (६०४१७ मते) स्वाभिमानीचे संजय शिंदे (५८३०७ मते) आणि कॉंग्रेसचे जयवंतराव जगताप (१४३४८ मते) यांचा पराभव केला शिवसेनेचे नारायण पाटील हे २५८ मतांनी विजयी झाले. आणि २००९ विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला.
२०१४ विधानसभा निवडणूकीत प्रथमच विधानसभा लढविणारे संजयमामा शिंदे यांना पडलेले मतदान हे सर्वांचे भुवया उंचविणारे होते. शिवसेनेचे नारायण आबा पाटील पहिल्यांदाच विधानसभेत गेले. 2014 विधानसभेला नारायण पाटील (शिवसेना)-६० हजार ६७४, रश्मी बागल (राष्ट्रवादी काँग्रेस)-६० हजार ४१७, संजयमामा शिंदे(स्वाभिमानी शेतकरी संघटना)-५८ हजार ३७७, जयवंतराव जगताप (काँग्रेस आय)-१४ हजार ३४८, जालिंदर जाधव(मनसे)-१ हजार १४६, नोटा-७३६ शिवसेनेचे नारायण पाटील हे २५७ मतांनी विजयी झाले होते.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सर्वांना लक्षात राहील अशी होती, भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळून ही नाट्यमय घडामोडी नंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस चे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना अचानक शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आणि राज्यात जुलै २०२२ मध्ये शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.
२०१९ विधानसभेला करमाळा मतदारसंघात निवडणूक लागण्याच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले होते, जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी कापून रश्मी बागल यांना देण्यात आली. नाट्यमय घडामोडी नंतर रश्मी बागल शिवसेनेकडून तर माजी आमदार नारायण पाटील आणि आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडणूक लढले. अतिशय चुरशीची आणि शेवट पर्यंत चाललेल्या निवडणूकीत संजयमामा शिंदे अपक्ष (७८८२२), नारायण आबा पाटील अपक्ष (७३३२८), रश्मी बागल शिवसेना (५३२९०) तर नोटा (१५९७) आमदार संजयमामा शिंदे यांनी ५४९४ मतांनी विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभा गाठली. संजयमामा शिंदे यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा धक्कादायक पराभव केला.
करमाळा विधानसभा मतदार संघाचे आजवरचे आमदार-
१) १९५२ ते १९५७- नामदेवराव महादेवराव जगताप
२) १९५७ ते १९६२- नामदेवराव महादेवराव जगताप
३) १९६२ ते१९६७- अण्णासाहेब महादेवराव जगताप
४) १९६७ ते१९७२- किसन गुंडीबा कांबळे
५) १९७२ ते१९७४- तायप्पा हरी सोनवणे
६) १९७४ ते१९७८- सुशिलकुमार संभाजीराव शिंदे
७) १९७८ ते१९८०- नामदेवराव महादेवराव जगताप
८) १९८० ते१९८५- नामदेवराव महादेवराव जगताप
९) १९८५ ते१९९०- रावसाहेब भगवानराव पाटील
१०) १९९० ते१९९५- जयवंतराव नामदेवराव जगताप
११) १९९५ ते१९९९- दिगंबर मुरलीधर बागल
१२) १९९९ ते२००४- दिगंबर मुरलीधर बागल
१३) २००४ ते२००९- जयवंतराव नामदेवराव जगताप
१४) २००९ ते २०१४- शामल दिगंबर बागल
१५) २०१४ ते२०१९- नारायण गोविंद पाटील
१६) २०१९ पासून- संजयमामा विठठलराव शिंदे