निवडणुकीतील मतदानाचा टक्का घसरला ; मतदान वाढविण्यासाठी मतदान सक्ती करणे गरजेचे


केत्तूर, दि. १४ (अभय माने)-
सध्या लोकसभा निवडणूका सुरू असून मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घटत चालला आहे. काल झालेल्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातही मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. त्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी मतदान न करणाऱ्या मतदारांच्या सर्व शासन सुविधा बंद करण्यात याव्यात अशी मागणी सजग / जागृत नागरिकांतून करण्यात येत आहे.राज्यात दर पाच वर्षांनी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, महापालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा अनेक संस्थांच्या निवडणुका होत असतात शासन पातळीवर मतदानाच्या टक्का वाढावा म्हणून अनेक प्रकारे जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यामध्ये पगाराला सुट्टी दिली जाते. आठवडी बाजार बंद ठेवण्यात येतात तरीही मतदार मतदान करायला जात नाहीत.अपवाद फक्त ग्रामपंचायत निवडणुकीचा या निवडणुकीत मात्र बऱ्यापैकी मतदान होते.
मतदान करणे हा सर्वसामान्य नागरिकांनाचा हक्क तर आहेच शिवाय आपल्या विचाराचं हक्काचा माणूस राज्यात आणि केंद्रात असल्यास गावातील व आपल्या परिसरातील अनेक कामे करणे सोपे जाते.यासाठी आपल्या हक्काचा उमेदवार निवडण्यासाठी गत पाच वर्षाने निवडणूका घेतल्या जातात.
परंतु दुसरीकडे मतदान न करणारी मंडळी मात्र शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सर्वात पुढे असतात.(संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दुष्काळ निधी, पीक नुकसान निधी, एसटी बस सेवेत 50 टक्के सवलत, दवाखान्यात सवलती या इतर शासकीय योजना व सवलती) परंतु निवडणुका आल्या की ही मंडळी खण्यापिण्यापासून ते चार पैसे मिळवण्यापर्यंत सर्वात आघाडीवर असतात, मात्र मतदान करण्याची वेळ आली हेच नागरिक जाणीवपूर्वक मागे राहून मतदान करण्यास टाळाटाळ करतात.यामुळे दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी कमीच होत चाललेली आहे.
त्यामुळे मतदान न करणाऱ्या लोकांच्या सर्व शासन सुविधा बंद करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे असे केल्यास मतदानाचा टक्का निश्चितच वाढणार आहे. मतदान करण्यासाठी कुठेतरी दबाव असणे गरजेचे आहे.




