करमाळ्यातील अण्णाभाऊ साठे नगर येथे मूलभूत सुविधांचा अभाव ; नगरपालिकेने तात्काळ सुविधा द्यावेत अन्यथा आंदोलन

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असून करमाळा नगरपालिकेने तात्काळ सर्व सुविधा तातडीने अदा कराव्यात अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज अन्याय व अत्याचार निवारण संघाचे शहराध्यक्ष विश्वराज आल्हाट व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मुख्य अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अण्णाभाऊ साठे नगर मध्ये गेल्या महिन्याभरापासून नळाला पुरेसे पाणी येत नाही. महिन्याभरापासून पाण्याचा ठणठणाट असल्याने पाण्यासाठी महिलांना व अबालवृद्धाना सैरभैर भटकावे लागत आहे. अण्णाभाऊ साठे नगर मध्ये सार्वजनिक शौचालयाची व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही. सतत गटारी तुंबलेल्या असतात दुर्गंधीचे साम्राज्य वाढलेले असून या घाणीमुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य अधिकारी व नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे जास्तीत जास्त आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तात्काळ अण्णाभाऊ साठे नगर मध्ये पुरेसे पाणी शौचालय व गटारीची स्वच्छता तात्काळ करावी व सर्व मुलभुत सुविधा पंधरा दिवसांत पुरवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज अन्याय व अत्याचार निवारण संघाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष विश्वराज अल्हाट, अभिजीत मंडलिक, सागर अल्हाट, ओमकार मंडलिक, अमित लोंढे, सनी मंडलिक, जालिंदर मंडलिक, ओम करंडे, विश्वदत्त मंडलिक, व्हि.एन.आल्हाट आदी कार्यकर्त्यांच्या यावर सह्या आहेत.


