माढा मतदारसंघात काहीही घडू शकते ; राजकीय पंडितांचे अंदाज यावेळी जनता चुकविणार- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर


जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
माढा लोकसभा मतदारसंघात काहीही घडू शकते, राजकीय पंडीतांचे अंदाज जनता चुकविणार असे सुचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केल्याने सर्वत्र याची चर्चा होऊ लागली आहे.
यावेळी अधिक बोलताना तळेकर यांनी सांगितले की, माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी बदलाचे संकेत दिल्यापासून माढा लोकसभा मतदार संघातील समीकरणे बदलण्याची शक्यता जादा प्रमाणात निर्माण झाली आहे. यातच माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी निवडणुक लढवावी हि मागणी जनतेतून जोर धरु लागली असुन यास मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या तरी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी थांबा आणि वाट पहा हे धोरण अवलंबिले असल्याने केवळ तर्क वितर्क काढले जात आहेत. जरी सोशल मिडीयावर सध्या नारायण (आबा) यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा जोरदारपणे चालू असून यास स्वतः नारायण (आबा) पाटील यांनी मात्र अधिकृतपणे दुजोरा दिला नाही.
यामुळे येत्या आठवडाभरात कोणत्या घडामोडी घडतात यावर विचार करुन पुढील पाऊल उचलले जाणार आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता सन २०१४ आणि सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकात माढा मतदार संघातील विजयी आणि पराभुत उमेदवारांच्या मतात फारसे अंतर दिसुन येत नाही.केवळ पन्नास हजार मतांच्या आसपास दोन्ही उमेदवारात फरक राहील. यामुळेच माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांची भुमिका यंदा निर्णायक ठरु शकते. यातच यंदाची निवडणुक हि जर जनतेच्या हाती गेली तर मात्र भल्याभल्यांचे या मतदार संघाच्या निवडणुक निकाला विषयीचे अंदाज चुकले जाण्याची शक्यता जादा प्रमाणात आहे. पाटील गटाकडून काल महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. अचानक आयोजित या बैठकीस सभापती अतुल पाटील, जि.प. सदस्य बिभीषण आवटे, बाजार समिती संचालक नवनाथ झोळ, आदिनाथ साखर कारखाना माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, राजु (अण्णा) पाटील, माजी सभापती शेखर गाडे, प्रा अर्जुनराव सरक आदि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत लोकसभा तसेच आगामी विधानसभा या दोन्ही निवडणुकीची चर्चा करण्यात आली. ही बैठक ऐनवेळेस आयोजित करण्यात आल्याने या बैठकीस उपस्थित राहु न शकलेल्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. सध्या पाटील गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणुन घेण्याचे नियोजन हाती घेण्यात आले असून जनमताचा कौल आणि पाटील गटातील कार्यकर्त्यांचे मत जाणुन घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.


