जेऊर येथील महिला शेतकऱ्याच्या शेतातील तुरीच्या पिकाचे व आंब्याच्या झाडांचे अज्ञात व्यक्तीकडून नुकसान ; शासनाने लाडक्या बहिणीला न्याय द्यावा- महिला शेतकऱ्याची मागणी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील महिला शेतकऱ्याच्या शेतातील तुरीच्या पिकाचे व आंब्याच्या झाडांचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केलेले असून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जेऊर येथील रहिवासी असलेल्या अंकिता पांडुरंग जाधव यांच्या मालकीची शेती गट क्रमांक- २६१/१ क याप्रमाणे असून सदर शेती ही मौजे जेऊर हद्दीत आहे. या शेतीमध्ये सध्या तूर पिकाची लागवड केलेली आहे. तसेच बांधाच्या कडेने आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे. दि. ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर पर्यंत शेतात असलेल्या तूर व आंबा पिकाचे प्रचंड प्रमाणात अज्ञात व्यक्तीने नुकसान केलेले आहे. अज्ञात व्यक्ती तूरीची व आंब्याची झाडे पूर्णपणे मोडून तिथेच जमिनीवर टाकत आहे. सदर महिला अल्पभूधारक शेतकरी असून, या महिला शेतकऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून पिकाचे नुकसान करून नाहक त्रास केला जात आहे. सदर शेतकरी महिलेची परिस्थिती अत्यंत गरीब असून मोल मजुरी करून उपजिविका करत आहेत. शेतीत केलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने महिला शेतकऱ्यावर अत्यंत गंभीर परिस्थिती उडवलेली आहे. तूर व आंबा पिकाच्या लागवडीसाठी इतरांकडून पैसे घेऊन घेऊन शेती लागवड व मशागत केली आहे.
सदर महिला शेतकऱ्यांनी शासनास निवेदन दिलेले आहे कीं मला न्याय मिळावा. माझ्या शेतीचे नुकसान करणारा अज्ञात व्यक्ती, माझ्या जीवितास सुद्धा धोका निर्माण का करू शकणार नाही? असे त्यांनी मत व्यक्त केले. आजूबाजूचे शेतकरी व भावकीतील काही लोकांची चौकशी करावी अशी त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शासनाने या लाडक्या बहिणीस न्याय देणेबाबत त्यांची मागणी आहे.