जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, करमाळ्यात परिवर्तन अटळ- नारायण आबाच आमदार होणार ; कार्यकर्त्यांचा विश्वास

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्यासाठी वातावरण अनुकूल असून विद्यमान आमदार शिंदे गट आणि बागल गटाच्या कारभाराला वैतागलेले नागरिक हे यंदाच्या विधानसभेला मतदान करून करमाळ्यात नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
करमाळा विधानसभेसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून तिरंगी होत असलेल्या या निवडणुकीत नारायण आबा पाटील हेच विजयी होणार असे बोलले जात आहे.
करमाळा विधानसभेसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटील-शिंदे-बागल यांच्यात निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नारायण आबा पाटील, अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे तर शिवसेना शिंदे गटातून मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल अशी पारंपरिक गटांमध्ये लढत होत आहे.
२००९ ला करमाळा विधानसभेची पुनर्रचना झाली आणि माढा तालुक्यातील ३६ गावांचा करमाळ्यात समावेश करण्यात आला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये या ३६ गावांमधील मतदान निर्णायक ठरलेले आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून तत्कालीन आमदार श्यामल बागल, २०१४ ला माजी आमदार नारायण आबा पाटील तर २०१९ ला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे विजयी झाले आहेत. यात ३६ गावांमधील मतदान निर्णायक ठरलेले आहे.
यावेळी विधानसभेला सत्तांतर होण्याची शक्यता असून मविआ कडून लढणारे नारायण आबा पाटील यांचे पारडे जड असून नारायण आबा पाटील पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य तसेच स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दल ची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेला पाठिंबा, करमाळ्यातील सावंत गटाचा पाठिंबा यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग सध्या सुसाट पहायला मिळत आहे.
सध्याची परिस्थिती बदललेली असून संजयमामा यांना २०१९ ला जरी जास्त मताधिक्य माढ्यातून मिळालेले असले तरी यावेळी चित्र वेगळे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले नारायण आबा पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत असून मागच्यावेळी पेक्षा यावेळी जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता असून तसे वातावरणही तयार झालेले असून आबा पाटलांना ३६ गावांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३६ गावांवर निर्णायक लढत होणार आहे.
करमाळ्यात पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी बागल-शिंदे-पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २०१९ ला हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात लढले होते. २०१९ प्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांना सफरचंद हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे तर रश्मी बागल यांच्या ऐवजी दिग्विजय बागल निवडणूक लढवित असून २०१९ प्रमाणे यावेळीही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तर नारायण आबा पाटील यावेळी तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत.