आमदार आबा पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागात पाहणी ; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची केली मागणी

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-
आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन प्रत्यक्षात पिक पाहणी केली असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले.
करमाळा मतदार संघात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेले दोन आठवडे झाले पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे आज करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिवसभर नुकसानग्रस्त भागात गावभेट दौरा केला.
यावेळी त्यांच्यासमवेत तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, कृषी सहायक नितीन रांजून, कृषी सहायक सुप्रिया शेलार, कृषी सहायक राहुल गव्हाणे, कृषी सहायक सचीन सरडे, सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे,आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ संचालक हनुमंत सरडे, विजयराव कोकरे, अजित नाईकनवरे, कैलास बोंदरे आदि उपस्थित होते. या दौऱ्यात शेटफळ येथील शेतकरी रंगनाथ पोळ, मुकूंद पोळ, विजय रामचंद्र लबडे, अनिल प्रल्हाद पोळ तर चिखलठाण येथील शिवाजी नारायण जगताप, कुगाव येथील बळीराम जनार्दन सरडे, प्रशांत लक्ष्मण कामटे आदी शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी, डाळींब, उडीद, कांदा आदि पिकांची प्रत्यक्षात पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली.
तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला.यावेळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाण्यासाठी रस्ते नसताना आमदार नारायण आबा पाटील यांनी वेळप्रसंगी ट्रॅक्टर मध्ये बसून तर काही ठिकाणी चिखल तुडवत चालत जाऊन बांधावर हजेरी लावली व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानीचे अहवाल तयार करुन वरीष्ठ कार्यालयात ते सादर करावेत अशा सुचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील गावांसह या मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातही अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अवकाळी मुळे हातातून गेली असून काही ठिकाणी काढणी केलेला कांदा रानात ढिग करुन ठेवले असल्याने तेही हाती लागले नसल्याचे सांगत जिथे मी जाऊ शकत नाही अशा मतदार संघातील सर्वच नुकसानग्रस्त भागात कृषी व महसुल विभागाचे अधिकारी जाऊन अहवाल तयार करतील, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसांगवधान दाखवून तातडीने केलेल्या या भेट व पाहणी दौऱ्यामूळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.