08/06/2025

आबा पाटलांची दहा वर्षांनी घरवापसी- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून होते पक्षात ; आगामी विधानसभा राष्ट्रवादीकडून लढविणार

0
f455030e02b44e789fffec2dd5114797.jpg

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी दहा वर्षांनी घरवापसी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात होते.

लोकसभा निवडणूक सध्या सुरू असून माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांना भाजप ने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज दाखल करून माढ्यातून दावेदारी केली. मोहिते-पाटील यांचे अत्यंत विश्वासू असलेले करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आज पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. करमाळ्यात धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती.

10 जून 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. स्थापनेपासून माजी आमदार राष्ट्रवादीत होते. 1999 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती, पहिल्यांदाच विधानसभा लढविणारे पाटलांना त्यावेळी विधानसभेला 12705मते मिळाली होती तर तत्कालीन आमदार कै दिगंबरराव बागल यांनी अपक्ष निवडणूक लढवून 43787 मते तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून 43106 मते मिळाली होती. पुढे 2002 साली सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत श्री पाटील राष्ट्रवादीकडून वांगी गटातून निवडून आले. आणि जिल्हा परिषद गाठली.

2004 साली काँग्रेस अन् राष्ट्रवादीची आघाडी झाली. करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटली, यात तत्कालीन आमदार कै दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेतून निवडणूक लढले या निवडणूकीत माजी आमदार पाटील यांनी माघार घेत श्री जगताप यांना पाठिंबा दिला. कै दिगंबरराव बागल यांचा पराभव करीत श्री जगताप यांनी पुन्हा विधानसभा गाठली, श्री जगताप यांच्या विजयात पाटलांचा मोठा वाटा होता.

2007 ला ही करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी विरोधी लाट तर कै दिगंबरराव बागल यांचे निधन झाल्यामुळे बागल गटाला सहानुभूती होती, एवढे असूनही नारायण पाटील वांगी गटातून निवडून आले होते. त्यावेळी करमाळा तालुक्यातील सहा जि.प गटांपैकी केवळ वांगी गटात श्री पाटील निवडून आले होते तर इतर पाच ठिकाणी बागल गटाचे उमेदवार निवडून आले होते.

2009 विधानसभेला करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटली, उमेदवारी न मिळाल्यामुळे नारायण पाटील यांनी बंडखोरी करीत माजी विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातून विधानसभा लढविली, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्यामल बागल यांना 70943 मते घेतली तर नारायण पाटील यांना 43126 मते मिळाली तर आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना सोडली, अन् समाजवादी पक्षातून निवडणूक लढविली त्यांना 25411 मते मिळाली. यावेळीआमदार श्यामल बागल विजयी झाल्या. या निवडणुकीत नारायण पाटील यांना मिळालेली मते हे भुवया उंचविणारे होते, पराभव जरी झाला असला तरी दोन नंबर ची मते घेऊन तालुक्यात पाटील गट मजबूत झालेला होता.

2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्री पाटील यांनी 14 मार्च 2014 ला राष्ट्रवादीला रामराम केला आणि शिवसेनेत प्रवेश केला. 2014 लोकसभेला माढ्यातून महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला, राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील निवडून आले.

2014 विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या सहा महिने अगोदर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. आतापर्यंतचे इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहामीच गटातटाचे राजकारण घडले पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या परंतु 2014 विधानसभा निवडणूकीत तत्कालीन  जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळच्या आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर कॉंग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील 60674 मते घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल 60417 मते स्वाभिमानीचे संजयमामा शिंदे 58307 मते आणि कॉंग्रेसचे जयवंत जगताप 14348 मते यांचा पराभव केला शिवसेनेचे नारायण पाटील हे 258 मतांनी विजयी झाले. आणि 2009 विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला.

2019 विधानसभेला करमाळा मतदारसंघात निवडणूक लागण्याच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले होते, जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील यांची उमेदवारी कापून रश्मी बागल यांना देण्यात आली. नाट्यमय घडामोडी नंतर रश्मी बागल शिवसेनेकडून तर माजी आमदार नारायण पाटील आणि आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडणूक लढले. अतिशय चुरशीची आणि शेवट पर्यंत चाललेल्या निवडणूकीत संजयमामा शिंदे अपक्ष 78822 , नारायण आबा पाटील अपक्ष 73328, रश्मी बागल शिवसेना 53290 तर नोटा 1597. आमदार संजयमामा शिंदे यांनी 5494 मतांनी विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभा गाठली. संजयमामा शिंदे यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा धक्कादायक पराभव केला. पण या निवडणुकीत नारायण पाटील यांना मिळालेली मते राजकीय विश्लेशकांची अंदाज चुकविणारे होती. पराभव जरी झाला असला तरी अपक्ष निवडणूक लढवून तब्बल 72 हजार मते मिळविणे ही पाटील गटाची जमेची आणि आणखी मजबूत करणारी होती.

2019 नंतर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पाटील गटाची सरशी झालेली दिसली. 2024 लोकसभेला धैर्यशील मोहिते-पाटील यांना भाजप ने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. मोहिते-पाटील यांचे विश्वासू नारायण पाटील यांनीही प्रवेश करण्याचे ठरविले आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश केला तब्बल एक दशकांनी श्री पाटील यांची घरवापसी झालेली आहे. आगामी विधानसभा तुतारी चिन्हावर निवडणूक लढवून पुन्हा विधानसभा गाठणार असल्याचे पाटील गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page