कुकडीचे पावसाळी आवर्तन सुरु ; लाभक्षेत्रातील पाणीसाठे भरुन घ्या- आमदार नारायण आबा पाटील यांची सुचना

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकीकडे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे तर दुसरीकडे कुकडी प्रकल्पातुन पावसाळी आवर्तन सुरू झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालूक्याच्या उत्तर भागात पावसाने दडी मारल्याने शेतातील उभी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज होती. कुकडी प्रकल्पातील वरील बाजूस असलेल्या धरणात अतिरिक्त पाणी झाले असुन काही धरणे ऐंशी टक्के भरल्याने यातुन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कुकडी डावा कालव्याच्या माध्यमातून कर्जत जामखेड करमाळा या तालूक्यांनाही पाणी देण्याचा निर्णय घेतला गेला. कुकडी सल्लागार समितीच्या बैठकीतच आपण यापुर्वीही मागणी केली होती.
तसेच सध्याचे पावसाचे अल्प प्रमाण पाहता कुकडीच्या माध्यमातून पाणी मिळावे अशी मागणी आपण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे केली होती. यातुनच आता सध्या कुकडी प्रकल्पात शेवटचे टोक असलेल्या करमाळा तालुक्यात आवर्तन सुरू असून मुख्य कालवा (२११ ते २४९) मधून मोरवड, वंजारवाडी, वीट, झरे, भोसे, पोंधवडी, विहाळ आदि गावांना पाणी दिले जाणार आहे.देलवडी नाला, कुंभारगाव तलाव, राजुरी, सावडी हे तलाव तसेच कोर्टी बंधारे आदि ठिकाणी पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे.
तर मांगी तलावातही कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे अशी मागणी आपण केली आहे. चालू आवर्तनातुन करमाळा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रातील सर्व तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, चारी आदि पाणी साठ्यात पाणी देण्याच्या सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



