कोण होणार आदिनाथचा ‘आका’? पाटलांसाठी प्रतिष्ठेची तर शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई ; थेट दुरंगी लढतीत आबा पाटलांच्या संजीवनी पॕनलचा विजय जवळजवळ निश्चित

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळीत उद्या १७ एप्रिलला मतदान होणार असून निवडणूक लागल्यापासून तिरंगी वाटणारी निवडणूक दुरंगी मोडवर आलेली असून पाटील-शिंदे यांच्यातच लढाई होणार आहे दरम्यान आमदार नारायण आबा पाटील यांच्या संजीवनी पॕनलचे पारडे जड असून पाटलांसाठी प्रतिष्ठेची तर शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे आदिनाथचा ‘आका’ कोण होणार हे येत्या १९ एप्रिल रोजी कळणार आहे.
दरम्यान आदिनाथ चा इतिहास पाहिला तर १९७१ साली ह्या कारखान्याचा भूमी पुजन झाले होते आणि तब्बल २० वर्षांनी पहिला गळीत हंगाम १९९२ साली पार पडला. आज पर्यंत चा इतिहासात सर्वात जास्त सत्ता राखण्यात बागल गटाला यश मिळाले आहे तर पाटील-जगताप गटाला एकदा सत्ता मिळविण्यात यश मिळालेले आहे.
बागल गटातून आतापर्यंत माजी मंत्री कै. दिगंबर बागल, गिरधरदास देवी, वामनराव बदे कै रावसाहेब पाटील, कै. प्रदिपकुमार जाधव-पाटील, तात्यासाहेब मस्कर आणि माजी आमदार श्मामल बागल, धनंजय डोंगरे यांनी चेअरमन पद भूषविले आहे तर पाटील-जगताप गटातून माजी आमदार जयवंत जगताप आणि कै. गोविंदराव पाटील यांनी चेअरमन पदाची धूरा संभाळली आहे.
मावळत्या निवडणुकीत आदिनाथ कारखान्यात बागल गटाची सत्ता होती. आदिनाथ ची अवस्था खूप बिकट होती गेल्या हंगामात नोव्हेंबर २०१६ पासून संचालक मंडळाने आदिनाथ मधील सर्व कामगारांना आॕगस्ट २०१७ पर्यंत ब्रेक दिलेला होता तरीही तालुक्यातील सभासदांनी बागल यांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले होते. २०१७ ला झालेल्या पाटील-बागल-शिंदे अशा तिरंगी लढतीत बागल गटाने बाजी मारली होती. परंतु यावेळी बागल यांनी माघार घेतली तर जगताप गटानेही माघार घेतलेली आहे.