06/06/2025

करमाळ्यात आमसभेचे आयोजन ; आमदार आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा होणार

0
1001608333.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
गेल्या पाच वर्षातील रखडलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमसभेच आयोजन केले असून नागरिकांनी सन २०१९ ते २०२४ मधील प्रलंबित कामे आमसभेत लेखी स्वरूपात मांडावीत असे आवाहन पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांनी केले.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यात शुक्रवार दिनांक ३० मे रोजी करमाळा येथील नालबंद कार्यालयात सकाळी १०:३० वाजता आमसभेस सुरुवात होणार असुन या बाबत गटविकास अधिकारी यांनी नागरिकांना प्रश्न दि १७ मे पुर्वी लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. यावर अधिक बोलताना प्रा अर्जुनराव सरक यांनी सांगितले की, सन २०१९ ते २०२४ या कालावधीत तत्कालीन आमदार महोदयांनी एकही आमसभा घेतली नाही. एकतर मतदार संघाशी त्यांचा संपर्क अत्यंत नाममात्र वेळेपुरताच होता. यामुळे या पाच वर्षाच्या काळात करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे अनेक लहान मोठे प्रश्न तथा कामे प्रशासनाकडून झाली नाहीत.

विधानसभा निवडणुकीत प्रचार काळात जनता जेंव्हा शासनाच्या विविध विभागात अर्ज करुनही पाच वर्षे नाही झालेली कामे केलेल्या अर्जानिशी दाखवू लागली तेंव्हा या कामांची सोडवणुक करायची असा निश्चय विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतला. यामुळे जनतेसाठीचा हा खुला न्यायमंच असल्याने यात मागील पाच वर्षातील कामांना निश्चित मार्ग काढून न्याय दिला जाणार आहे. मागील पाच वर्षात आमदार आपल्या दारी हा उपक्रम एक राजकीय स्टंट म्हणून राबवला गेला. यातुन ज्या विभागाशी अथवा ज्या अधिकाऱ्यानी कामे जाणीवपूर्वक करावयाची टाळली ते अधिकारी गावात आलेच नाहीत ही एक एकत्रीत प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांनी आमसभा घेण्याचे निश्चित केले. आमदार पदाची सुत्रे हाती घेऊन नारायण आबा पाटील यांना काही महिने झाले आहेत.

अशातच या आमसभेतून मागील पाच वर्षाचा विकासाचा बॅकलॉग काही प्रमाणात का होईना भरुन काढता येईल व सर्वसामान्य माणसाला त्याच्या वैयक्तिक शासकीय कामांना गति मिळेल हा आमसभा भरवण्यामागचा उद्देश आहे. यामुळे नागरिकांनी तसेच गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मागील पाच वर्षात दुर्लक्षित झालेली कामे लेखी स्वरूपात आमसभेत ठरवून दिलेल्या वेळे आधी संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोच करावीत व त्या अर्जाची प्राप्त पोहोच सुध्दा स्वतः कडे ठेवावी असे आवाहन पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page