जेऊर येथील ॲड. शहानूर सय्यद ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड 2023’ या जागतिक पुरस्काराने सन्मानित



जेऊर, दि. 28 (करमाळा-LIVE)-
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणाऱ्या ‘वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन’ म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघ यांच्या वतीने करमाळा वकील संघाच्या माजी अध्यक्ष ॲड. शहानुर अहमद सय्यद यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड 2023’ या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविवार दि. 23 जुलै रोजी श्रीरामपूर येथील वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघ यांच्या महाराष्ट्र राज्य चाप्टर यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक कल्याणकारी कार्याचा आढावा घेऊन मिळालेले विविध पुरस्कार व बेस्ट ॲडव्होकेट व नोटरी याबाबत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच ॲड. सय्यद यांची डब्ल्यू.सी.पी.ए.च्या मानद कायदेशीर सल्लागारपदी निवड झाल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यू सी पी ए चे प्रेसिडेंट प्रा .नरसिंह मूर्ती हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यू.सी.पी.ए.चे दुसरे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ गांधीवादी नेते प्रा .ईपी मेनन, श्रीरामपूर महाराष्ट्र राज्य संपादक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, समाजसेविका संगीता जामगे हे होते.
या कार्यक्रमात चित्रपट तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान पुरस्कार, ‘पाऊस’या विषयावरील काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान, श्रीरामपूर येथील साई विठ्ठल अनाथ आश्रमानातील गरीब मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, मंजीत बतरा पर्यावरण पुरस्कृत पर्यावरण पूरक पिशव्यांचे अनावरण इत्यादी उपक्रम घेण्यात आले. या गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात नरसिंह मूर्ती यांनी आपले विचार मांडताना जगातील एकंदरीत घडामोडीवर भाष्य करताना सांगितले की,जगाची वाटचाल युद्धाच्या दिशेने जात असताना आपल्याला या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी युद्धाची नाहीतर शिक्षणाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. डब्लू.सी.पी.ए.चे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या कामाचे कौतुक करताना प्रा नरसिंह मूर्ती अक्षरशः भारावून गेले.
प्रा.ई.पी. मेनन यांनी आपले विचार मांडताना खऱ्या अर्थाने शिक्षणाची व पर्यावरण संवर्धनाची काय गरज आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सोबतच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी समर्पक असे मार्गदर्शन करून व सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी अहमदनगरचे नैमित्त उद्योजक प्रसन्नकुमार धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव ऋषिकेश विघावे यांनी केले.


