पाच वर्षात एकही आमसभा न घेणारे आमदार संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात भित्रे आणि पळपुटे आमदार ; पाटील गटाचा हल्लाबोल

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
पाच वर्षात एकदाही आमसभा न घेणारे आमदार संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात भित्रे आणि पळपूटे आमदार आहेत असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील गटाकडून विद्यमान आमदार यांच्यावर करण्यात आला.
याबाबत सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले की, आमसभा घेणे हे प्रत्येक आमदारांना बंधनकारक आहे. यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांचेत समन्वय घडून मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लागतात. आमसभेत झालेल्या ठरावांना विधानसभा कामकाजात महत्व देऊन गांभीर्याने सदर कामे केली जातात. परंतु विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. ही पळपुटेपणाची लक्षणे असून करमाळा मतदार संघाने एवढा पळपुटा आमदार यापूर्वी कधीही पहिला नाही.
नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा विषय आमसभेत मंजूर करून घेऊन पुढे गेला असता तर एव्हाना योजनेचे प्रत्यक्षात काम सुरु झाले असते. शासनाच्या सर्व विभागाचा आढावा प्रत्यक्ष जनतेसमोर घेतला गेला असता तर यातून आपलेच पितळ उघडे पडेल या भीतीपोटी आमदार यांनी आमसभा घेण्याचे टाळले आहे. सन २०१४ ते २०१९ मध्ये एक आमसभा, एक वीज दरबार आणि सात तालुकास्तरिय आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. या शिवाय वेगवेगळ्या विषयावर शासकीत विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. मागील काळात झालेल्या आमसभेत उजनीच्या पाण्या बाबत काही महत्वाचे ठराव जनतेच्या उपस्थित मंजूर करण्यात आले होते. यामुळे चालू पाच वर्षात आमसभा होणे गरजेचे होते.
आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत करमाळा तालुक्यातील जनतेची माफी मागावी आमदार आपल्या दारी सारखा प्रोग्राम राबवण्यापेक्षा दर वर्षी आमसभा (कोरोना कालावधी वगळून) घेतली असती तर यात जनतेने मांडलेल्या विषयावर सरकारने आणि प्रशासनाने गंभीरतेने तोडगा काढला असता व यातील बरेच प्रश्न सुटले असते. महसूल, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्वाच्या विभागात आज जनतेच्या शेकडो तक्रारी न सोडवता फायलीत बंद आहेत.
याला आमसभेमुळे मोकळीक मिळून हे प्रश्न गतीने सुटले असते. यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेचा हा अधिकार व आवाज डबन्याचे काम केले आहे. आजवरच्या करमाळा तालुक्यातील सर्व आमदारांनी आपल्या कालावधीत आमसभा घेतल्या. मग सन २०१९ ते २०२४ मध्ये अद्याप एकदाही आमसभा का झाली नाही याचे उत्तर आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेला द्यावे. किमान इथे सुद्धा पळपुटे पणा दाखवू नये. अन्यथा आगामी काळात जनतेसमोर मते मागायला जागा उरणार नाही असा टोलाही तळेकर यांनी लागवला. तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करमाळा मतदार संघात आमसभा नाही झाले बाबत पाटील गट लेखी तक्रार नोंदवणार असल्याची माहिती श्री तळेकर यांनी दिली आहे.