आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार असल्याची खात्री प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केली.
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या बाबत माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे पारडे सध्या जड असल्याबाबत अधिक खुलासा करताना तळेकर यांनी सांगितले की, करमाळा मतदार संघातील मतदारांनी सन २०१४ ते २०१९ आणि सन २०१९ ते २०२४ या दोन आमदार पदाच्या टर्म मध्ये तुलना करूनच आपली मतदानाची दिशा ठरवली आहे. तत्कालीन आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा मतदार संघात ३३/११ के व्ही क्षमतेची नवीन वीज उपकेंद्र उभारली व जुन्या उप वीज केंद्राचे सक्षमिकारण केले, सतरा वर्षे रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना अपुरे काम पूर्ण करून कार्यान्वित केली आणि करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेती ओलीताखाली आणली.
दोन दशक कालावधी उलटून गेला तरी नादुरुस्त असलेले मतदार संघातील अनेक गावांना जोडणारे मोठे रस्ते दुरुस्त तर केले पण याशिवाय जवळपास ९५० किमी तालुका अंतर्गत रस्ते पक्के केले. करमाळा बस्थानक नूतनिकरण, पुनर्वसन गावांना अठरा नागरी सुविधा, प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण आरोग्यकेंद्र व उपजिल्हा रुग्णालय सक्षमिकारण, कुकडी लाभ क्षेत्रात सतरा पाणी आवर्तने, प्राथमिक शाळांना संगणक व वर्ग खोल्या तसेच संरक्षण भिंती, स्मशान व दफन भूमी, जलयुक्त शिवार योजना, वाडी वस्तीवर हायमास्ट दिवे, भगीरथ वीज पुरवठा, वाचनालये, समाजमंदिर व सभामंडप यासह हजारो रुग्णांना शस्त्रक्रिये साठी शासकीय निधी ही कामे केली. या कालावधी मधील विकास मतदारांना प्रत्यक्षात दिसून आला. यामुळे माजी आमदार यांच्या या टर्मची कामगिरी व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची या चालू पाच वर्षातील निष्क्रियता याचा फरक मतदारांच्या लक्षात आल्यानेच बदल करण्याचे वारे वाहू लागले आहे. जनता ही निवडणूक आपल्या हाती घेऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मतदार संघात विकासाचा मुद्दा हा निवडणुकीचा आत्मा असून हा जनतेचा आवाज या निवडणुकीत नारायण (आबा) पाटील यांच्या विजयाने अधिक बोलका होईल असे सूचक वक्तव्य यावेळी तळेकर यांनी केले.