करमाळ्यात पुन्हा ‘नारायण युग’ ; तीन हजार कोटींच्या कागदावरच्या विकासाला जनतेने सपशेल नाकारले, बागलांची पराभवाची हॕट्रिक, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
बहुचर्चीत असलेल्या करमाळा विधानसभेवर पुन्हा एकदा नारायण पाटलांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला असून बागलांची पराभवाची हॕट्रिक झालेली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी ९६०९१ मते घेत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा १६०१९ मतांनी पराभव केला असून संजयमामा शिंदे यांना ८०००६ एवढी मते तर शिंदे गटाकडून लढत असलेले दिग्विजय बागल यांचा पराभव झालेला आहे. बागल यांना ४०५४१ एवढी मते मिळाली
२००४ पासून गेल्या वीस वर्षांंपासून सुरू असलेली लोकप्रतिनीधी बदलाची परंपरा यावेळी कायम राहिली, पहिल्यापासून पारंपरिक पाटील-शिंदे-बागल गटात झालेल्या तिरंगी लढतीत अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी नारायण पाटील विजयी झाले आहेत. तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे आणि प्रथमच निवडणूक लढवित असलेले दिग्विजय बागल यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे.
नारायण पाटलांचा स्वगृही राष्ट्रवादी प्रवेश आणि आमदार-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले नारायण आबा पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळला. याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य तसेच स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दल ची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेला पाठिंबा, करमाळ्यातील सावंत गटाचा पाठिंबा यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग यावेळी सुसाट पहायला मिळला.
३ हजार कोटींचा विकास, कागदावरचा विकास आणि पराभव-
विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी सभा घेतली त्या सभेत ३ हजार कोटींची विकास कामे झाल्याचे अजितदादा बोलले होते, विरोधकांनी याचा पुरेपूर समाचार घेऊन जनतेसमोर खरे काय आहे याची गणिते मांडली, कागदावरच्या विकासाला जनतेने सपशेल नाकारले असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला आहे.
बागलांच्या पराभवाची हॕट्रिक आणि बागल गटाचे अस्तित्व धोक्यात-
२०१४, २०१९ आणि २०२४ ला अशी पराभवाची हॕट्रिक बागल गटाची झालेली आहे, निवडणूक लागल्यापासून दिग्विजय बागल हे रेस मध्ये नव्हतेच. पाटील-शिंदे-बागल अशी तिरंगी असणारी निवडणूक दुरंगी मोडवर आली. एकेकाळी एक नंबरला असलेल्या बागल गटाचे अस्तित्व आता धोक्यात आले असून भविष्यात गट टिकवायचा असेल तर तर आत्मचिंतण करण्याची गरज आहे.