करमाळा मतदारसंघातील जनतेने निमगावं पॅटर्न पाडून आपल्याला घरी का बसवले याचे आत्मचिंतन माजी आमदार शिंदे यांनी करावे- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहिगावं उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालू असून करमाळा व माढा तालुक्यातील जनतेने निमगाव पॅटर्न नाकारला आहे याचे भान माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ठेवावे असा हल्लाबोल पाटील गटाकडून करण्यात आला.
सध्या करमाळा तालुक्यातील पुर्व भागात दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनातुन पाणी दिले जात आहे. या योजनेच्या कामावरुन माजी आमदार संजययामा शिंदे यांनी विद्यमान आमदार महोदयांना टिकेचे लक्ष केले होते. यावर पाटील गटाकडून आज सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आली. यावेळी बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की, आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहिगाव उपसा सिंचन योजना शंभर टक्के क्षमतेने चालू आहे. दहिगाव येथील सहा तर कुंभेज येथील चार पंप पाणी उपसा करत आहेत. गेल्या पाच वर्षात सर्वच्या सर्व पंप सुरु राहण्याची हि पहिलीच वेळ आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी दाखवलेल्या कार्यतप्तरतेने पुर्व भागातील ओढे, तलाव, नाला बिल्डींग, शेततळी ही भरुन वाहत आहेत. कोट्यावधी रुपयांची रब्बी पिके वाचली गेली आहेत. शिवाय एक महिन्याहुन अधिक काळ अविरतपणे आवर्तन चालू असल्याने पुर्व भागात जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी मुरत असुन परक्युलेशनचा अप्रत्यक्ष फायदाही शेतकऱ्यांना होत आहे.
या भागातील विहिरी व कुपनलिका यांचे पाणी टिकून राहण्यास उघड्या चारीतुन दिलेले पाणी महत्वाचे ठरले आहे. शेतकरी आता मागील पाच वर्षांपासून मिळणारी आवर्तने आणि चालू आवर्तन याची तुलना करु लागले आहेत व यातुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी खुश आहेत हे दिसून येत असल्याने माजी आमदार संजय शिंदे पोटदुखी झाली आहे. यातुनच मग शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही खोटेनाटे आरोप त्यांनी केले आहेत.बंदिस्त पाईप लाईनचे काम ठेकेदार आणि अधिकारी यांचे पातळीवर असून यात आमदार महोदयांचा हस्तक्षेप नाही.उलट हे काम शेतकऱ्यांच्या हिताचे आहे असे जर माजी आमदार संजय शिंदे यांना आता वाटत असेल तर त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काम सुरु करण्यापेक्षा त्यांच्या पाच वर्षाच्या काळात एखादी आमसभा घेऊन त्यात हा विषय मांडण्याचे धाडस दाखवले पाहिजे होते.
सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता या समिकरणासाठीच तत्कालीन आमदार महोदयानी हे काम घाई घाईत सुरु केले. नारायण आबा पाटील हे विकासप्रिय आमदार आहेत. त्यांनी या अगोदर केलेली विकासकामे जनहिताची व ठळक दिसणारी टिकाऊ अशी आहेत व इथुन पुढेही चालू राहतील. परंतु करमाळा व माढा तालुक्यातील जनतेने लोकांना वेठीस धरण्याचा व कागदावर विकास दाखवून शासनाचा निधी हडप करण्याचा, दहशत व दादागिरीचा निमगाव पॅटर्न जनतेने नाकारला आहे याचा विसर शिंदे बंधूना पडु नये.
अगोदर आपला निमगाव पॅटर्न का पडला व जनतेने आपल्याला का घरी बसवले याचे आत्मचिंतन शिंदे यांनी करावे. अकलूज पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न आहे हे मान्य करावे. उगीच जनतेची दिशाभूल करणे सोडून द्यावे. आमदार नारायण आबा पाटील हे करमाळा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असुन जनतेने त्यांना आमदार म्हणून काम करण्याची दुसऱ्यांदा संधी दिली आहे. या मतदार संघात होणारे प्रत्येक विकासकाम हे जनतेचे याबद्दल काय मत आहे हे तपासून केले जाईल. दहिगावं उपसा सिंचन योजना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पाच वर्षात पुर्ण पणे आपले सिंचन क्षेत्र ओलिताखाली आणेल. या योजनेतुन मिळणारे उन्हाळी आवर्तनही लगेच देण्याची सुचना आमदार नारायण आबा पाटील यांनी केल्याने पुर्व भागातील सर्व गावे तसेच झरे, पोपळज यासारखी अन्य गावे यांना पाणी दिले जाणार आहे. पुढील आठवड्यात आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुक्यातील संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणासाठी नियोजन बैठक होणार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.