07/06/2025

कर्मयोगी गोविंदबापूंनी आदिनाथच्यावेळी दिलेल्या त्यागाची पूर्ण तालुक्याला जाण ; अॕड अजित विघ्ने यांचा बोलवता धनी माजी आमदार संजयमामा शिंदेच ; अशा कृतीची किंमत मोजावी लागणार- प्रवक्ते सुनील तळेकर

0
IMG-20250312-WA0040.jpg

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-
कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या आदिनाथ कारखान्याच्या त्यागाबद्दल अॕड अजित विघ्ने यांनी केलेल्या वक्तव्याचा बोलविता धनी माजी आमदार संजयमामा शिंदे हेच असून आगामी काळात त्यांना या कृतीची किंमत मोजावी लागेल असा खणखणीत इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिला आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी एक बैठक बोलविली होती व यात अॕड अजित विघ्ने यांनी कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या बाबत एक चुकीचे विधान केले. यावर आज आमदार नारायण आबा पाटील गटाकडून भुमिका स्पष्ट करण्यात आली.

यावर बोलताना तळेकर यांनी सांगितले की कर्मयोगी गोविंदबापू पाटील हे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी श्रध्दास्थान आहेत. त्यांच्या त्यागाबद्दल अॕड अजित विघ्ने यांनी चूकीचे विधान केले. वास्तविक पाहता अजित विघ्ने हे एक प्यादे आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांना मुळात या तालुक्यातील कायदा शांतता व सुव्यवस्था बिघडवायची आहे. संजयमामा शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला असून त्यांच्या बरोबरच बबनदादा यांनाही आपल्या मुलाचा पराभव डोळ्यांदेखत पहावा लागला. माढा तालुक्यातील जनतेने शिंदे बंधूना नाकारले आहे हे मतदानातुन सिध्द झाले आहे.

यामुळे आता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळ्यात येऊन आपले उरले सुरले अस्तित्व टिकवण्यासाठी ही घाण पध्दत अवलंबली आहे. संजयमामा शिंदे यांना केवळ करमाळा तालुक्यातीलच नव्हे तर माढा तालुक्यातील ३६ गावातील मतदारांनी नाकारले आहे. याचीच सल शिंदे बंधूच्या मनात कुठे तरी सलत असून त्यांनी आता आपल्या एका बाजारभुजग्या व चारित्र्य हिन कार्यकर्त्या करवी कर्मयोगी गोविंदबापू पाटील हे आज हयात नसताना त्यांचेवर‌ चुकीचे वक्तव्य करायला लावले.

यामुळे त्यांनी शिखंडी सारखे पडद्याआड राहून कार्यकर्त्यां करवी असली वक्तव्ये करु नये. झाल्या प्रकाराची क्षमा मागून वेळीच चुकीची दुरुस्ती करावी अन्यथा पाटील गटाकडून पुढील पाऊल उचलले जाईल. माढा तालुक्यातील दादागिरी व गुंडगीरी जनतेने आता पुर्ण मोडीत काढली असून आता संजयमामा शिंदे यांनी ही आकागीरी बंद करावी. शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावावर खोटी कर्ज काढलेली व पैसे हडप केलेली प्रकरणे अजून मिटली नाहीत. फसल्या गेलेल्या या शेतकऱ्यांमध्ये अनेक शेतकरी हे करमाळा तालुक्यातील आहेत याचे भान राखावे.

अॕड अजित विघ्ने या व्यक्ती बद्दल पाटील गटाकडून काही प्रतिक्रिया द्यावी इतपत हा व्यक्ती लायकीचा नाही. परंतु चुकून का होईना एका संविधानीक पदावर राहिलेल्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मात्र त्यांच्या गटाचे नेतृत्व‌ करत असताना डोके ठिकाणावर ठेऊन करावे. करमाळा तालुक्यातील जनतेच्या भावना दुखावतील अशा वक्तव्याचा स्वतः निषेध करावा अन्यथा त्यांच्या पाठबळामुळे त्यांच्या समोर‌ केलेले हे वक्तव्य त्यांनाच अडचणीत आणणारे ठरेल असा इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page