आषाढी एकादशीच्या तोंडावर करमाळा शहरातील रस्त्यांची डागडुजी तातडीने करावी – जितेश कटारिया

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात वारकरी व भाविकांची वर्दळ वाढणार असल्याने सर्व मुख्य रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी भाजप सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.
सध्या पावसाचे दिवस असून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालकांना किंवा पादचाऱ्यांना त्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रमुख बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची अवस्था अधिक खराब असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी एकादशीसाठी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, दिंड्या आणि वारकऱ्यांचे आगमन होणार आहे.. अनेक ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही रस्त्यावरच केली जाते.शहरात सर्वात मोठी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी असते.त्यात 35 ते 40 हजार भाविकांची जेवणाची व्यवस्था रस्त्यावर केली जाते.. रस्त्याच्या दुर्दशामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगरपालिकेने तातडीने रस्त्यांची डागडुजी करून सहकार्य करावे.





